Tharala Tar Mag 14 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. आश्रम संदर्भातील नोटीस सायलीच्या हाती लागल्यावर आता अर्जुननं केसची सुनावणी करण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे. या केसवर कोण सुनावणी करणार, याचा सुगावा आधीच महिपतला लागला होता. त्यामुळे महिपतने जजला देखील पैसे देऊन आपल्या बाजूने वळवून घेतलं. त्यामुळे आता कोर्टात आपलीच बाजू खरी ठरणार, अशी त्याची समजूत होती.
अर्जुन आणि सायली दोघेही आपल्या गाडीने कोर्टाच्या आवारात पोहोचतात, त्यांच्यासमोर महिपत शिखरे आणि त्याची मुलगी साक्षी शिखरे येतात. यावेळी ‘तू कोर्टात कशाला आलास? आतमध्ये गेलो की अर्ध्या तासात माझ्या बाजूने निर्णय लागणार आणि मी आश्रमावर हातोडा चालवायला मोकळा होणार. तिकडे माझं मोठं रिसॉर्ट उभं राहणार. तू उगाचच कष्ट करू नकोस,’ असं म्हणत महिपत अर्जुनला परत जायला सांगत होता. मात्र, अर्जुनने त्याला चांगलंच उत्तर दिलं. ‘कोर्ट तुझ्यासारख्या खोट्या माणसांना पाठीशी घालत नाही. कोर्टात सत्याचीच बाजू घेतली जाते आणि सत्य माझ्या बाजूने आहे. त्यामुळे मला कोणीही हरवू शकत नाही,’ असं अर्जुन महिपतला ठणकावून सांगतो.
मात्र, महिपतच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसत आहे. हा आत्मविश्वास नेमका कुठून आला याचा शोध अर्जुन घेतोय. अर्जुन आणि सायलीनंतर आता कुसुमताई आणि मधुभाऊ देखील कोर्टात हजर होणार आहेत. मधु भाऊंना बघून सायली भावूक होणार आहे. तर, ‘माझं घर वाचवा’, अशी विनंती मधुभाऊ अर्जुनला करताना दिसणार आहेत. कोर्टाची सुनावणी सुरू होताच, जज सुरुवातीपासूनच महिपतची बाजू उचलून धरताना दिसणार आहेत. या केसमध्ये आधीच भरपूर तपासणी झाली आहे, आता पुन्हा पुन्हा त्यात चौकशी करून काय वेगळं मिळणार नाही, त्यापेक्षा कोर्ट महिपत शिखरे यांना त्यांची जमीन देऊन, त्यावर कुठल्याही प्रकारचा बांधकाम करण्याची परवानगी देत आहे, असा निर्णय जजने दिला होता.
मात्र, त्याचवेळी अर्जुनचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेलं. जज आणि महिपत दोघेही एकमेकांकडे बघून हसत आहेत, हे लक्षात आल्यावर अर्जुनने जज पैसे घेऊन महिपतच्या बाजूने निर्णय देतोय, हे ओळखलं. आता या परिस्थितीत आपण कितीही युक्तिवाद केला, तरी जज आपलं काहीही ऐकणार नाही, हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलं होतं. यावेळी अर्जुनने आपली हुशारी वापरून या केसमध्ये आपल्याला शेवटचं एकदा स्वतःच्या आश्रमात जाऊन काही तपास करायचा आहे, असं म्हणून कोर्टाकडून वेळ मागून घेतला. आता अर्जुन स्वतः सायलीला सोबत घेऊन जाऊन विलासच्या खुनासंबंधित पुरावे आश्रमात शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. जर, अर्जुनच्या हाती पुरावे लागले, तर महिपत आणि त्याची मुलगी साक्षी दोघेही कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत.
संबंधित बातम्या