Surbhi Hande New Series : ‘गाववाटा’ ट्रॅव्हेल सीरिजचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री सुरभी हांडे या सीरिजमधून प्रेक्षकांना महाराष्ट्रातील दुर्गम गावांच दर्शन घडवणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी अतिशय दुर्गम भागात एक शांत आंबावडे गाव वसलेलं आहे. त्या गावाचा इतिहास, तेथील संस्कृती जपणारी माणसं यांचं अतिशय देखणं रूप या पहिल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. सुरभीने एका अशा गावाला भेट दिली आहे, जिथे निसर्गाची शांतता आणि पारंपरिक जीवनशैली अजूनही जिवंत आहे.
अभिनेत्री सुरभी हांडे ‘गाववाटा’ ट्रॅव्हेल सीरिजच्या अनुभवाविषयी बोलताना म्हणाली की, ‘गाववाटा या सीरिजच शूटिंग अतिशय दुर्गम गावांमध्ये झालं आहे. अशी गाव होती जिथे पाणी आणि वीज अजूनही पोहोचली नाही आहे. या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. १५ घरांचं दुर्गम गाव म्हणजे आंबावडे. या गावात आपण फक्त बोटीने जाऊ शकतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावात आम्ही कोयना बॅक वॉटरमधून बोटीने गेलो. तिथली माणसं खूप प्रेमळ आहेत. मी आयुष्यात पहिल्यांदाच नदीतले मासे खाल्ले. तेथील माणसं मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. तिथे एक शाळाही होती. त्या शाळेतील मुलं गुणी आणि शिस्तबद्ध होती. खरंच या लहान मुलांसोबत आणि येथील माणसांसोबत आंबावडे गावातील माझा दिवस संपूच नये असं वाटतं होतं.’
ती पुढे म्हणाली की, 'प्रेक्षकांना माझी विनंती आहे की, काही काळ इंटरनेट आणि सोशल मीडिया पासून दूर राहून अशा गावांमध्ये काही काळ घालवा. जिथे फक्त तुम्ही आणि निसर्ग असेल. तुम्हाला आमची गाववाटा ही ट्रॅव्हेल सीरीज कशी वाटली हे नक्की अभिप्राय देऊन कळवा.'
अनुश्री फिल्मच्या बॅनरखाली तयार झालेल्या गाववाटा ट्रॅव्हेल सीरिजची निर्मिती मयूर शेखर तातुस्कर यांनी केली आहे, तर शुभम दिलीप घाटगे यांनी या सीरिजची संकल्पना आणि दिग्दर्शन केले आहे. शिवाय या सीरिजचे लेखन शुभम दिलीप घाटगे आणि सह लेखन हेमांगी काकडे यांनी केले आहे. तंत्रज्ञांच्या टीममध्ये छायांकन अनुभव सुरेहतिया आणि अभिषेक चिंचोळकर तर एडिटिंग कल्याण दीप आणि दिशा जैन यांनी केले आहे. पराग जाधव यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी सांभाळली तर सहाय्यक दिग्दर्शन अमिताभ भवार आणि श्वेता नाईकडे यांनी केले असून मेकअप आर्टिस्ट मानसी काटकर यांनी केले आहे. विनया प्रदिप सावंत यांनी पब्लिसिटी आणि मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संपूर्ण टीम 'गाववाटा' ट्रॅव्हल सीरिजमधून महाराष्ट्रातील सुंदर गावांचं दर्शन प्रेक्षकांना घर बसल्या घडत आहे.
संबंधित बातम्या