Suraj Chavan Marathi Film : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता ठरल्याने सध्या सगळीकडेच चर्चेत असलेला सूरज चव्हाण नुकताच मोठ्या पडद्यावर झळकला आहे. त्याचा मराठी चित्रपट ‘राजाराणी’ १८ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, सूरज चव्हाणच्या या चित्रपटाला अन्यायाचा सामना देखील करावा लागला आहे. त्याचा 'राजाराणी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ‘राजाराणी’ या चित्रपटात बिग बॉस जिंकून आलेला सूरज चव्हाण मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'राजाराणी' हा चित्रपट पोस्टर रिलीजपासूनच चर्चेत आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे कथानक मुला-मुलींना आत्महत्या करायला भाग पाडत आहे, म्हणून हा चित्रपट बंद करावा, अशी मागणी सुप्रसिद्ध वकील वाजीद खान यांनी केली होती.
मात्र, त्यांच्या या मागणीमुळे त्यांच्याविरोधात प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. प्रेक्षकांनी वकील वाजीद खान यांच्या या मागणीवर नाराजी देखील व्यक्त केली होती. तर, सूरज चव्हाणच्या चाहत्यांनी सोशल मीडियामध्ये 'आय सपोर्ट सूरज चव्हाण आणि आय सपोर्ट राजाराणी चित्रपट' म्हणत पोस्ट शेअर करून त्याला आणि त्याच्या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला होता. यावेळी निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी वकील वाजीद खान यांना विनंती केली की, एकदा व्यवस्थित चित्रपट पहा आणि आपलं मत कळवा. तर, वकील वाजीद खान यांनीही चित्रपट पाहून निर्मात्यांना फोन करून आपण यावर चर्चा करून, पत्रकार परिषद घेऊ अशी विनंती केली होती.
यानंतर वकील वाजीद खान आणि ‘राजाराणी’ चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, प्रमुख अभिनेते रोहन पाटील यांनी नुकतीच पुण्यातील पत्रकार भवन येथे एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी वकील वाजीद खान यांनी ‘राजाराणी’ चित्रपटाचा अभिनेता सूरज चव्हाण व संपूर्ण चित्रपटाच्या टीमची जाहीर माफी मागितली. इतकंच नाही तर, माझ्याकडून गैरसमजातून व पूर्ण माहिती न घेता हे वक्तव्य करण्यात आलं असून, ज्यांची मन दुखावले असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो, असं देखील वकील वाजीद खान यांनी म्हटलं आहे.
‘आमचा चित्रपट खरा आहे व आम्ही अतिशय जबाबदारी पूर्वक आणि अतिशय गरीब परिस्थितीमधून हा चित्रपट बनवला आहे. आमचा चित्रपट लोक स्वीकारत आहेत व प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. लोकच या चित्रपटाला न्याय देत आहेत’, असं चित्रपटाचे लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी म्हटले. ‘आमचा चित्रपट सत्य आहे आणि सत्य एक दिवस जिंकत आणि 'राजाराणी' चित्रपट हा सुपरहिट होणाच्या मार्गावर आहे’, असं यावेळी दिग्दर्शित शिवाजी दोलताडे म्हणाले. तर, ‘सूरज चव्हाण आणि आमच्यावर झालेला हा अन्याय पुसून निघालेला आहे, ‘राजाराणी’ चित्रपट लोकांना आवडत आहे आणि लोक 'राजाराणी'ला सुपरहिट करणार’, असं मत अभिनेता रोहन पाटील यांनी मांडलं.
संबंधित बातम्या