महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना टोल माफ केल्याची घोषणा केली. पण या टोल माफीमुळे होणारे ट्राफीक पाहून मराठमोळा अभिनेता सुमीत राघवन चिडला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, 'आम्हाला टोल माफीचे गाजर नको' असे स्पष्ट मत मांडले आहे.
मराठमोळा अभिनेता सुमीत राघवन हा त्याच्या बिनधास्त वक्तव्यासाठी विशेष ओळखला जातो. नुकताच त्याने दहिसर टोल नाक्यावर आलेला अनुभव शेअर केला आहे. सुमीतने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. 'आम्हाला टोल माफीचे गाजर नको. परिस्थिती जास्त बिकट झाली आहे तुमच्या ह्या टोल माफीच्या निर्णयामुळे. प्रत्येक लेनमध्ये वाट्टेल तशी जड वाहनं घुसली आहेत. २५/२५ मिनिटं लागतायत दहिसर टोल पार करायला' अशी पोस्ट सुमीतने केली आहे. तसेच त्याने ही पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केली आहे.
शिवसेना-भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने १९९५ ते १९९९ या काळात बांधलेल्या ५५ उड्डाणपुलांसाठी ४५ रुपये टोल आकारला जात होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली. दरम्यान, २००० सालापासून, मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. मात्र, १५ ऑक्टोबर पासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रवासी वाहनांचा टोल माफ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. दररोज साधारण सहा लाख वाहने मुंबईत ये-जा करतात. मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातील निर्णयामुळे लाखो वाहन चालकांना फायदा होणार आहे. मात्र, जड वाहनांना टोल माफी नाही.
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य
सुमीत च्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. सुमीतने 'आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर', 'संदूक', 'आपला माणूस', 'दुनियादारी', 'साडे माडे तीन' यांसारख्या मराठी सिनेमांमध्ये तर 'माय नेम इज खान', 'हॉलिडे' यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर त्याची 'साराभाई वर्सेस साराभाई' ही मालिका प्रचंड गाजली होती.
संबंधित बातम्या