मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  RRR 2: ‘आरआरआर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार? ऑस्कर मिळाल्यावर काय म्हणाले एसएस राजमौली...

RRR 2: ‘आरआरआर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार? ऑस्कर मिळाल्यावर काय म्हणाले एसएस राजमौली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 15, 2023 09:13 AM IST

SS Rajamouli film RRR 2: ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासूनच लोकांच्या मनात त्याच्या दुसऱ्या भागाबाबतही प्रश्न होता.

RRR
RRR

SS Rajamouli film RRR 2: साऊथचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचले आहेत. आता या चित्रपटाने ऑस्करसारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यासपीठावरही यशाचा झेंडा रोवला आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात ऑस्कर पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. अर्थात आता जगभरात ‘आरआरआर’ची जादू दिसत आहे. मात्र, या सगळ्यात चाहत्यांना एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे ‘आरआरआर’चा दुसरा भाग येणार का? यावर आता स्वतः एसएस राजामौली यांनी उत्तर दिलं आहे.

‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासूनच लोकांच्या मनात त्याच्या दुसऱ्या भागाबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आरआरआर’चा दुसरा भाग येणार का? आणि येणार असेल तर तो काही येणार? हे सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घायायचे होते. या संदर्भात अनेक प्रश्न देखील विचारले गेले होते. मात्र, आता ऑस्कर जिंकल्यानंतर एसएस राजामौली यांनीच यावर भाष्य केले आहे. ‘आरआरआर’च्या टीमने लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर जिंकल्याचा आनंद साजरा केला.

यावेळी राजामौली यांना चित्रपटाच्या सीक्वलबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना एसएस राजामौली सांगितले की, ऑस्कर पटकावल्यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वलच्या कामाला वेग येईल. या चित्रपटाची पटकथा विजयेंद्र प्रसाद लिहित आहेत, याची माहिती देखील त्यांनी दिली. एसएस राजामौली, एमएम कीरावानी यांच्यासोबतच्या ऑस्कर आफ्टर पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांना एका मुलाखतीत ‘आरआरआर २’बद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, याबद्दल आताच फार काही सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.

मात्र, एसएस राजामौली यांच्या या वक्तव्यानंतर ‘आरआरआर’चा दुसरा भाग लवकरच पाहायला मिळणार असल्याचे दिसते आहे. राजामौली यांनी केलेले हे वक्तव्य ऐकून आता चाहते देखील उत्सुक झाले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्यासारखे मातब्बर कलाकार झळकले होते. या चित्रपटाने जगभरात १२०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग