Sky Force Review In Marathi : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच २४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि निमरित कौर यांच्याही भूमिका आहेत. तुम्ही देखील या विकेंडला चित्रपट बघायला जाण्याचा विचार करत असाल, तर एकदा हा रिव्ह्यू नक्की वाचा.
या चित्रपटाची कथा विंग कमांडर के. ओ. आहुजा यांच्यापासून सुरू होते, जे एका पाकिस्तानी कैद्याची चौकशी करत असतात. के. ओ.आहुजा, टी कृष्णन विजयाचा (वीर पहारिया) शोध घेतो, जो त्याचा ज्युनिअर आहे आणि एका हवाई हल्ल्यानंतर बेपत्ता आहे. टी कृष्णन विजयाचे लग्न गीता विजया (सारा अली खान) सोबत होते, जी सध्या गरोदर आहे. मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित झालेल्या भारतीय हवाई दलातील एकमेव अधिकारी अजमादा बोप्पया देवय्या एमव्हीसी यांच्यावर आधारित असलेल्या या कथेचा गाभा म्हणजे आहुजा यांचा शोध आहे.
दिग्दर्शक संदीप आणि अभिषेक यांनी ६० चे दशक दाखवण्यात उत्तम काम केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात तुम्हाला अनेक भावनिक प्रसंग पाहायला मिळतील. हवाई दलाचे प्रोटोकॉल समजावून सांगायला आणि समजून घ्यायला बराच वेळ लागतो . मध्यंतरानंतर सर्च ऑपरेशन ड्रामा सुरू होतो. हा चित्रपट प्रेक्षकाला त्याच्या खुर्चीशी खिळवून ठेवतो. लता मंगेशकर यांच्या 'ऐ मेरे वतन के लोग' या गाण्याचा निर्मात्यांनी चित्रपटाच्या शेवटच्या १० मिनिटांत केलेला वापर हा या चित्रपटाचा मास्टरस्ट्रोक आहे.
'स्काय फोर्स' चित्रपटातील अक्षयचा अभिनय तुम्हाला नक्कीच आवडेल. तसं, बघायला गेलं, तर प्रेक्षकांनी त्याला अनेकदा देशभक्तीपर अवतारात पाहिलं असेल, पण भावनिक दृश्यादरम्यान त्याला रडताना पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील. चित्रपटाचा क्लायमॅक्स चांगलाच दमदार असून याचे श्रेय नक्कीच अक्षयला जाईल.
वीर पहारिया याने या चित्रपटात खूप दमदार अभिनय केला आहे. सारा अली खान आणि निमरित यांना थोडी स्क्रीन स्पेस मिळाली आहे. साराला मोठा सीन मिळाला होता, पण ती अपेक्षेवर खरी उतरू शकली नाही. शरद केळकर याने आपली व्यक्तिरेखा उत्तम रीतीने साकारली.
या चित्रपटाचा व्हीएफएक्स खूप चांगला आहे. तनिष्क बागचीचं संगीत कथेशी, विशेषत: मनोज मुंतशिरच्या गाण्याशी चांगलंच जोडलं गेलं आहे. एकंदरीत ‘स्काय फोर्स’ तुम्हाला सैनिकांच्या संघर्षाची कहाणी दाखवणार आहे. शेवटच्या भागात दाखवले जाणारे रिअल लाईफ कॅरेक्टर्सचे रील आणि मोंटेज तुम्हाला नक्कीच हादरवून टाकेल. हा चित्रपट तुम्ही आपल्या कुटुंबासोंबत नक्कीच पाहू शकता.
संबंधित बातम्या