Happy Birthday Shreyas Talpade : आज म्हणजेच २७ जानेवारीला बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आपला ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही, तर बॉलिवूड आणि साऊथलाही आपली भुरळ पडणारा श्रेयस सगळ्या प्रेक्षकांचा लाडका आहे. मराठी चित्रपटसृष्टी नव्हे, तर तो बॉलिवूडमधील देखील एक मोठे नाव आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'इकबाल' या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटाने त्याला मनोरंजन विश्वात ओळख मिळवून दिली होती. मात्र, या चित्रपटामुळे श्रेयसचे लग्न पणाला लागले होते.
या चित्रपटात श्रेयसला एका मुलाच्या रुपात दाखवण्यात आले होते, जो नीट बोलू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही आणि तरीही त्याला क्रिकेटर बनायचे होते. या चित्रपटातील त्याचा अभिनय खूप आवडला होता. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या सहा महिन्यांपूर्वी श्रेयसने दीप्ती तळपदेशी लग्न केले होते, पण त्याला ही गोष्ट काही महीने गुप्त ठेवावी लागली. काही वर्षांपूर्वी श्रेयसने आपल्या एका मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर त्याच्या लग्नाबद्दल खूप दुःखी असल्याचा खुलासा केला होता. एकीकडे 'इकबाल'चे शूटिंग सुरू होते, तर दुसरीकडे श्रेयसची लग्नघाई सुरू होती. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होतच आले होते आणि श्रेयसला आणखी तीन दिवस शूटसाठी द्यावे लागणार होते. मात्र, याचवेळी त्याने दिग्दर्शकाशी संपर्क साधला आणि ३१ डिसेंबरला एक दिवस सुट्टीची विनंती केली.
श्रेयसला तीन दिवसांत चित्रपटाचे शूटिंग सुरू करायचे होते, पण त्याला ३१ डिसेंबरला एक दिवस सुट्टी हवी होती. पण, जेव्हा त्याने ही गोष्ट दिग्दर्शकाला सांगितली, तेव्हा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्याला लग्न रद्द करण्यास सांगितले होते. त्याचा लग्नाचा या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेवर परिणाम होऊ नये, असे त्याला वाटत होते. कारण तो एका तरुण मुलाची भूमिका साकारत होता.
याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला होता की, 'मी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होतो, ज्याच्या लग्नाची पत्रिका छापून नातेवाईकांना दिली गेली होती आणि आता त्याला ते लग्न रद्द करण्यास सांगितले जात होते. मला काय करावं कळत नव्हतं. खूप समजावून सांगितल्यावर आणि मी लग्न गुपित ठेवीन असे आश्वासन दिल्यानंतर मला त्यासाठी परवानगी मिळाली.'
संबंधित बातम्या