
आबालवृद्धांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेलं नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी.’ २२ डिसेंबर २०१७ यादिवशी 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा शुभारंभ झाला होता. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही 'संगीत देवबाभळी'ची नाट्य दिंडी विसावणार आहे. या नाटकाचा आता शेवटचा प्रयोग होणार आहे.
'संगीत देवबाभळी’ या नाटकाला ४४ पुरस्कार मिळाले आहेत. या नाटकाने लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही 'देवबाभळी' आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे. बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे. करोना काळातही या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि प्रेक्षकांनी नाटकाला हजेरी लावली.
वाचा: दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये दिसणार 'दयाबेन?' काय आहे सत्य जाणून घ्या
हा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि आपल्या साथीने तो यशस्वही झाला. मध्ये करोना सारखं भयाण संकट येऊन गेलं पण त्यानंतरही आपलं प्रेम कमी झालं नाही, ते चंद्रभागेसारखं वाहतच राहिलं.
अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी 'संगीत देवबाभळी' हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे. खरं तर मायबाप रसिकांचा आग्रह आहे की, नाटक बंद करू नका मात्र कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं, म्हणून ही वारी ५०० व्या प्रयोगापर्यंत नेवून आपण थांबणार आहोत अशी भावना नाटकाच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे मोठ्या दिमाखात सादर होत आहे.
संबंधित बातम्या
