गेल्या काही दिवसांपासून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. या अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरुष निर्माते व दिग्दर्शक यांच्याविरोधात तक्रार केली. दरम्यान, अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने इतर काही तेलुगू कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांसमवेत तेलंगणा सरकारला तेलुगू चित्रपट सृष्टीतील (टीएफआय) लैंगिक छळाबाबत हेमा समितीच्या अहवालासारखा अहवाल प्रकाशित करण्याची विनंती केली आहे.
सामंथाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक स्टेटमेंट जारी केले आहे. हे स्टेटमेंट मल्याळम इंडस्ट्रीमधील काही अभिनेत्रींनी देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. 'व्हॉइस ऑफ वुमन इन टीएफआय' या नावाचे स्टेटमेंट सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. 'आम्ही तेलुगू चित्रपट सृष्टीतील महिला हेमा समितीच्या अहवालाचे स्वागत करतो आणि केरळमधील डब्ल्यूसीसी (वूमन इन सिनेमा कलेक्टिव्ह) च्या अथक प्रयत्नांचे कौतुक करतो. त्यांनी सतत घडणाऱ्या या घटनांवर उपाय शोधला आहे' असे या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
डब्ल्यूसीसीकडून प्रेरणा घेत टीएफआयमधील महिलांसाठी व्हॉईस ऑफ वुमन हा सपोर्ट ग्रुप २०१९ मध्ये तयार करण्यात आला होता. तेलंगणा सरकारने लैंगिक छळाबाबत असाच अहवाल प्रसिद्ध करावा, अशी मागणी करत निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही तेलंगणा सरकारला विनंती करतो की, टीएफआयमध्ये महिलांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण प्रस्थापित करण्यासाठी लैंगिक छळावर सादर केलेला उपसमितीचा अहवाल प्रकाशित करावा. ज्यामुळे सरकार आणि उद्योग धोरणे तयार करण्यास मदत होईल."
सामंथा व्यतिरिक्त तेलुगू अभिनेत्री मांचू लक्ष्मी प्रसन्ना, सुमा कनकला, प्रगती महावाडी आणि चित्रपट दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी यांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर ही स्टोरी शेअर केली आहे.
वाचा: सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे खेळणार 'एक डाव भुताचा', काय आहे नेमकी भानगड वाचा
न्यायमूर्ती हेमा समितीच्या २३५ पानांच्या अहवालात मल्याळम चित्रपटसृष्टीतील पुरुष कलाकारांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या स्फोटक आरोपांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीवर १०-१५ पुरुष निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचे नियंत्रण असल्याचे म्हटले जाते. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अनेक महिला कलाकारांनी त्यांच्या पुरुष कलाकारांविरोधात तक्रारी केल्या, ज्यामुळे अभिनेता-राजकारणी मुकेश, सिद्धिक, जयसूर्या, मणियनपिल्ला राजू, इदवेला बाबू आणि दिग्दर्शक रणजित यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. २०१७ च्या अभिनेत्री अत्याचार प्रकरणानंतर केरळ सरकारने ही समिती स्थापन केली होती आणि तिच्या अहवालात मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांचा छळ आणि शोषणाच्या घटना उघडकीस आल्या होत्या.
संबंधित बातम्या