Karan Arjun Re Releasing In Theaters : बॉलिवूडमध्ये असे फार कमी प्रसंग आले आहेत, जेव्हा शाहरुख खान आणि सलमान खान यांनी एकत्र काम केले आहे. पण जेव्हा-जेव्हा असं घडलं, तेव्हा बॉक्स ऑफिसवर एक नवा इतिहास रचला गेला. १९९५मध्ये जेव्हा त्यांचा 'करण अर्जुन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला, तेव्हा चाहत्यांना इंडस्ट्रीतील दोन बड्या सुपरस्टार्सना एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहण्याची संधी मिळाली. या चित्रपटात राखी गुलजार यांनी शाहरुख आणि सलमानच्या आईची भूमिका साकारली होती. तर, दिवंगत अभिनेते अमरीश पुरी नकारात्मक भूमिकेत दिसले होते.
'करण अर्जुन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटानंतर शाहरुख खान आणि सलमान खान यांना पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्याची चाहते वाट बघत होते. या दरम्यान असे काही प्रसंग आले, जेव्हा चाहत्यांना दोघांना एकत्र पाहण्याची संधी मिळाली. पण, 'करण अर्जुन'मध्ये जसे ते एकत्र दिसले, तसे पुन्हा त्यांना पाहता आले नाही. आता अखेर चाहत्यांना पुन्हा एकदा शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहता येणार आहे. कारण, १९९५मध्ये आलेला हा सुपरहिट चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडचा भाईजान म्हणजे अभिनेता सलमान खान याने आपल्या ट्वीतर हँडलच्या माध्यमातून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. त्याने लिहिले की, ‘राखीजींनी चित्रपटात बरोबर सांगितले होते की, माझा करण अर्जुन पुन्हा येतील... २२ नोव्हेंबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये.’ राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ४ ते ६ कोटी रुपये खर्च आला होता आणि या चित्रपटाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर ४३ कोटी रुपयांची कमाई केली होती. सलमान आणि शाहरुख खान यांचा हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याच्या बातमीने चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. चाहते या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
एका सोशल मीडिया पेजने या चित्रपटाच्या नवीन भागाचे पोस्टर देखील शेअर केले आहे. यासाठी त्याने एआय तंत्रज्ञान वापरले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक जुने चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये पाहण्याची संधी मिळाली आहे. तर, काही दिवसांनी या चित्रपटांच्या पुढील भागाची घोषणा करण्यात आली आहे. ‘तुंबाड’च्या बाबतीत असं घडलं आणि गदर-२ प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी गदरचा पहिला भाग रिलीज केला. त्यामुळे आता ‘करण-अर्जुन’च्या बाबतीतही चाहत्यांना तेच पाहायला मिळणार का? हे येणारा काळच सांगेल.
संबंधित बातम्या