Rukhwat Marathi Movie Review : सध्या क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या हॉरर चित्रपटांची क्रेझ भरपूर वाढताना दिसत आहे. असे चित्रपट पाहाण्याकडे प्रेक्षकांचा कल देखील चालला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकही हे सिनेमे बनवण्यावर भर देताना दिसून येत आहेत. गेल्या काही काळात अशाच विषयांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवताना दिसले. नुकताच असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मराठी चित्रपटाचे नाव आहे 'रुखवत'. या चित्रपटात एक हटके थ्रिलर कथानक पाहायला मिळाले आहे. कसा आहे हा चित्रपट? वाचा हा रिव्ह्यू...
'रुखवत' या चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या कालखंडात घडत आहे. एकीकडे आजच्या काळातील एका पुरातत्वशास्त्र महाविद्यालयचे काही विद्यार्थी त्यांच्या अभ्यास सहलीच्या निमित्ताने एका पुरातन वाड्यात जातात. हा वाडा तब्बल ४०० वर्षे जुना आहे. या वाड्याचं रूपांतर एका संग्रहालयात करण्यात आलं आहे. याच वाड्यात अभ्यासासाठी हे विद्यार्थी पोहोचतात. याच विद्यार्थ्यांमध्ये अमर आणि महिमा हे दोघे देखील आहे. वाडा बघत असताना, त्यांना एक मांडलेलं रुखवत दिसतं. या रुखवतामध्ये नवरा-नवरीच्या रूपात बाहुला-बाहुली आणि त्यांचा भातुकलीचा संपूर्ण संसार मांडण्यात आला आहे. मात्र, जसे महिमा आणि अमर या रुखवतासमोर जातात, तसं त्यांच्या कानात काही आवाज ऐकू येऊ लागतात. इथूनच हा खेळ सुरू होतो.
सुरुवातीला महिमा आणि अमर यांना भास झाल्यासारखे वाटते. मात्र, याच वेळी वाड्यात फिरायला आलेल्या कुटुंबातील दोन लहान मुले हे बाहुले उलून आपल्या बॅगेत लपवतात आणि महिमा व अमरला वेगळाच त्रास सुरू होतो. या बाहुल्यांमधून येणारे आवाज शोधण्यासाठी महिमा आणि अमर एका गावात जातात आणि इथेच त्यांच्या पुनर्जन्माचा खुलासा होतो. पुढे त्यांच्यासमोर एक धक्कादायक घटनेचा उलगडा होतो. आता नेमकं काय घडतं हे जाणून घेण्याण्यासाठी तुम्हाला 'रुखवत' हा चित्रपट बघावा लागेल.
'रुखवत'च्या निमित्ताने हलक्या-फुलक्या अंदाजातील थ्रिलर कथानक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही जोडी मुख्य भूमिकेत दिसली आहे. यांच्यासोबतच अभिनेते अशोक समर्थ, अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिरसाटकर हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत. सगळ्या कलाकारांचा अभिनय त्यांच्या पात्रात व्यवस्थित दिसले आहेत. मात्र, कथा काहीशी थंडावलेली दिसते. थ्रिलरच्या अनुषंगाने या चित्रपटाची कथा काहीशी वेगाने पुढे जाणे अपेक्षित होती. मात्र, कथेची पकड काही ठिकाणी सुटताना दिसते. कलाकारांनी आपल्या अभिनयाने ही कमान सावरली आहे. मात्र, चित्रपटाचे संगीत अगदीच सुमार वाटते. मात्र, शेवटी नक्की काय घडते हे पाहण्यासाठी प्रेक्षक शेवटपर्यंत थांबतात.
संबंधित बातम्या