Rang Maza Vegla: कार्तिक दीपावर उगवणार सूड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार मोठा ट्वीस्ट!
Rang Maza Vegla latest update: १४ वर्षांच्या मोठ्या लीपनंतर आता ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं कथानक देखील एका वेगळ्या वळणावर आलं आहे.
Rang Maza Vegla Latest Update: छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत आता तब्बल १४ वर्षांचा लीप दाखवण्यात आला आहे. १४ वर्षांच्या या मोठ्या लीपनंतर आता मालिकेचं कथानक देखील एका वेगळ्या वळणावर आलं आहे. दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली अर्थात दीपिका आणि कार्तिकी आता मोठ्या झाल्या आहेत. एक मुलगी डॉक्टर झालीये. तर, दुसरी देखील कॉलेजमध्ये आहे.
कार्तिक न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आता १४ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार असून, त्याच्या स्वभावात मोठा बदल होणार आहे. दीपानेच बदल घेण्यासाठी मुद्दाम हा डाव रचला आणि आपल्याला तुरुंगात धाडलं असा कार्तिकचा समज झाला आहे. याचा सूड आता कार्तिक उगवणार आहे. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला असून, यात कार्तिकचं बदललेलं रूप पाहायला मिळालं आहे. कार्तिकचं हे नवं रूप पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही काहीही करू शकली नाही. यातही कार्तिकने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पोलिसांच्या तावडीतून पळ काढला होता. यावेळी त्याने साक्षीच्या मुलाची मदत घेत स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. यावेळी पुन्हा एकदा कार्तिकच्या मनात दीपाविषयी गैरसमज निर्माण केला जातो. दीपानेच कार्तिकला पकडून दिले, असे त्याला सांगितले जाते.
याचाच राग कार्तिकच्या मनात राहिला आहे. हाच राग मनात धरून तब्बल १४ वर्षानंतर तुरुंगाबाहेर आलेला कार्तिक दीपाकडून बदला घेणार आहे. याची सुरुवात कार्तिक दीपाला घाबरवण्यापासून करणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे बदललेलं कथानक पाहायला मिळणार आहे.