Rajesh Khanna Death Anniversary: बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना यांचे नाव घेतले की, त्यांच्या सुपरहिट चित्रपटांची नावे लगेचच जीभेवर येऊ लागतात. कधी ‘मेरे सपनो की रानी’ गुणगुणलं जातं, तर कधी 'बाबू मोशाय...जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं' हा त्यांचा संवाद जीवनाचं सार सांगून जातो. आज (१८ जुलै) राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन आहे. राजेश खन्ना यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळी उंची प्राप्त केली होती. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे ते पहिले सुपरस्टार होते. अभिनेते राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७१ दरम्यान सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हटले गेले.
राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळात असे स्टारडम पाहिले आहे, ज्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे. चेतन आनंदच्या ‘आखिरी खत’ या चित्रपटामधून पदार्पण करणारे राजेश खन्ना हे एकेकाळी बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानले जायचे. ४०व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आखरी खतने भारतातील सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता. यानंतर राजेश खन्ना यांनी 'राज', 'औरत', 'बहारों के सपने', 'इत्तेफाक' आणि 'डोली' या चित्रपटांमध्ये काम केले.
राजेश खन्ना यांच्या स्टारडमची सुरुवात शक्ती सामंत यांच्या ‘आराधना’पासून झाली. यानंतर त्यांनी सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 'आराधना'ला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. राज खोसला यांच्या 'दो रास्ते' या चित्रपटानेही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. यानंतर राजेश खन्ना यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ते एकामागून एक हिट चित्रपट देतच गेले.
मनमोहन देसाईंच्या 'सच्चा जूठा'मध्ये राजेश खन्ना यांनी गावकरी भोलाची भूमिका केली होती. तर, अभिनेत्री मुमताजने त्यांच्या प्रेयसीची भूमिका केली होती. राजेश खन्ना आजही मुकुल दत्त याच्या ‘आन मिलो सजना’मधील आशा पारेख सोबतच्या 'अच्छा तो हम चलते हैं' या गाण्यातील अभिनयासाठी लक्षात आहेत. याशिवाय 'आनंद', 'अंदाज', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची', 'जोरू का गुलाम' हे त्यांचे चित्रपट आजही खूप पसंत केले जातात. राजेश खन्ना यांचे १८ जुलै २०१२ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मात्र, तरीही ते आपल्या दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
संबंधित बातम्या