Rajesh Khanna Death Anniversary: बॉलिवूडमधील सर्वात पहिला सुपरस्टार म्हणून अभिनेते राजेश खन्ना ओळखले जातात. त्यांचे नाव जरी घेतले तरी लगेचच त्यांच्या सुपरहिट चित्रपटांची नावे जीभेवर येऊ लागतात. राजेश खन्ना यांनी जितकी लोकप्रियता मिळवली तितकी आजवर इतर कोणत्याही अभिनेत्याला मिळवता आलेली नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीत एक काळ असा होता, जेव्हा २० वर्ष केवळ राजेश खन्ना यांच्या नावाची हवा होती. एखाद्या चित्रपटात राजेश खन्ना भूमिका करणार हा एकच फॅक्टर चित्रपट सुपरहिट ठरण्यात महत्त्वाचा होता. पण बीग बींच्या एण्ट्रीने सर्व काही बदलले.
आज १८ जुलै रोजी राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन आहे. राजेश खन्ना यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळी उंची प्राप्त केली होती. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे ते पहिले सुपरस्टार होते. अभिनेते राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७१ दरम्यान सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हटले गेले. मात्र, त्याच दरम्यानच्या काळात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली. अमिताभ बच्चन यांच्या एन्ट्रीचा मोठा परिणाम राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीवर झाला होता.
चेतन आनंदच्या ‘आखिरी खत’ या चित्रपटामधून पदार्पण करणारे राजेश खन्ना हे एकेकाळी बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानले जायचे. ४०व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आखरी खतने भारतातील सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता. यानंतर राजेश खन्ना यांनी 'राज', 'औरत', 'बहारों के सपने', 'इत्तेफाक' आणि 'डोली' या चित्रपटांमध्ये काम केले. राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळात असे स्टारडम पाहिले आहे, ज्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे.
राजेश खन्ना यांच्या स्टारडमची सुरुवात शक्ती सामंत यांच्या ‘आराधना’पासून झाली. यानंतर त्यांनी सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 'आराधना'ला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. राज खोसला यांच्या 'दो रास्ते' या चित्रपटानेही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. यानंतर राजेश खन्ना यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ते एकामागून एक हिट चित्रपट देतच गेले.
काही काळानंतर त्यांच्या स्टारडमलाही उतरती कळा लागली होती. त्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती. असे म्हटले जाते की, अमिताभ बच्चन यांनी जेव्हा फिल्मी दुनियेत प्रवेश केला, तेव्हा राजेश खन्ना नावाची जादू लोकांमधून ओसरू लागली. या मागचं मुख्य कारण होतं कारण होतं अॅक्शनपट... अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत अॅक्शनपटांची रांगच लावायला सुरुवात केली होती. तर, दुसरीकडे राजेश खन्ना यांची इमेज रोमँटिक हिरो अशीच होती. यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं.
वाचा: पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक कलाच! कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट व्हायरल
२०११मध्ये राजेश खन्ना यांना कॅन्सरचे निदान झाले होते. पण, त्यांना ही गोष्ट फक्त त्यांच्या जवळच्या लोकांपुरती मर्यादित ठेवायची होती. आपल्याला कर्करोग झाल्याचे चाहत्यांना कळू नये यासाठी त्यांनी सगळ्यांनाच सक्त ताकीद देऊन ठेवली होती. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाख करण्यात आले होते. १६ जुलै रोजी ते घरी परतले होते. मात्र, १८ जुलै रोजी राहत्या घरातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कर्करोग असल्याचा खुलासा झाला होता.
संबंधित बातम्या