प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील हे फार महत्त्वाचे असतात. पण ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला, तरी समोरच्या संकटांना, लढा देण्याची प्रेरणा मिळते, ते म्हणजे बाबा. त्यामुळे फादर्स डेच्या दिवशी जवळपास सर्वजण आपल्या वडीलांसोबतच्या आठवणी शेअर करताना दिसतात. अशीच एक आठवण 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अक्षय म्हात्रेने सांगितली आहे.
अक्षय म्हात्रेने 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत बाबाची भूमिका साकारत असताना आलेले अनुभव आणि आपल्या वडिलांसोबतच्या गोड आठवणींना उजाळा दिला. " मी पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये दोन लहान मुलींच्या बाबाची भूमिका साकारत असताना अनेक गोष्टी शिकतोय. सगळ्यात पहिले म्हणजे त्यांच्यासोबत काम करत असताना सय्यम शिकलो आणि मी हे खूप सकारात्मक दृष्टिकोनातून बोलत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे निस्वार्थ प्रेम जे ओव्हर द इयर्स जसे आपण आयुष्यात पुढे जातो आपल्या मध्ये ते कमी होत जातं. आपण तोलून मापून आणि जपून बोलतो पण लहान मुलांमध्ये ते फिल्टर नसत. ते कुठल्याही स्वार्थाने वागत नाहीत बोलत नाहीत, त्यांच्या सगळ्या भावना निर्मळ आहेत आणि ती गोष्ट शिकण्यासारखी आहे. महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर लहान मुलं गोष्टी लवकर आणि खूप सहजतेने शिकतात. मी चिनू-मनूचा ऑनस्क्रीन बाबा आहे, पण ऑफस्क्रिन त्याच्याशी मस्ती करत असताना मी भान ठेवतो की मी काय बोलतोय आणि कसा वागतोय कारण ते आपल्याला बारकाईने पाहून शिकत असतात. त्या दोघींच्या सहवासात राहून एक ऊर्जा वाढते की आपण ही उत्तम माणूस व्हावं म्हणजे ते ही आपल्याकडून चांगल्या गोष्टी शिकतील" असे अक्षय म्हणाला.
वाचा: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल
पुढे अक्षय वडिलांविषयी बोलताना म्हणाला की, "माझं आणि माझ्या बाबांचं नातं थोडं वेगळं आहे. लहानपणी बाबांसोबत तसं मैत्रीच नातं नव्हतं. माझे बाबा थोडे कडक शिस्तीचे होते म्हणून लहानपणी आमच्या गप्पा आणि बोलणं तसं नव्हतं आणि मी ही थोडा शांत होतो. आमचं नातं माझ्या वयाच्या २० व्या वर्षांमध्ये मध्ये खुलत गेलं आम्ही वेगवेगळ्या विषयवर बोलू लागलो मग ते सिनेमा, राजकरण किंवा रोजच्या आयुष्याच्या घडामोडी असो. आता अशीवेळ आली आहे की मी माझ्या आईपेक्षा बाबांशी तासंतास बोलतो. बाबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे ते न बोलता खूप काही करुन जातात, त्यांच गोष्टींकडे बारीक लक्ष असतं कोणाला काही मदत लागणार असेल किंवा घरात कश्याची गरज असेल ते बरोबर लक्ष देऊन ती गरज पूर्ण करतात. कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत माझे बाबा. ते माझं कौतुक असं बोलून करत नाही पण मला माहिती आहे की त्यांनी बोलून जरी नाही दाखवलं तरी त्यांना माझा अभिमान आहे आणि मी ही असंच उत्तम काम करून त्यांना अभिमान बाळगण्याची कारणे देत राहायचा प्रयत्न करत आहे. ते कधी ना कधी मला शाबाशकी नक्की देतील ह्याची मला खात्री आहे. बाबांना इतकंच बोलू इच्छितो 'आय लव्ह यु बाबा' आणि हैप्पी फादर्स डे!”
वाचा: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात
संबंधित बातम्या