सुकुमार दिग्दर्शत 'पुष्पा २ द रुल' रुल' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. गुरुवारी, ५ डिसेंबर रोजी या चित्रपटाचे सर्व शो जवळपास हाऊसफूल असल्याचे दिसत होते. आता एका शो दरम्यान विचित्र प्रकार घडल्याचे दिसत आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील थिएटरमध्ये विषारी गॅस फवारला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खोकला, घशात जळजळ आणि उलट्या झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी थिएटरमध्ये ‘पुष्पा २ द रुल’ सिनेमाचा शो सुरु असताना एका अज्ञात व्यक्तीने अचानक विषारी गॅस फवारला आहे. हा गॅस फवारल्यानंतर थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना त्रास होऊ लागला. या गॅसमुळे प्रेक्षकांना खोकला, घशात जळजळ आणि उलट्या झाल्या आहेत. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपटाचे प्रक्षेपण १५ ते २० मिनिटे थांबवण्यात आले होते. मुंबई पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी, वांद्रे येथील गॅलेक्सी थिएटरची तपासणी केली.
पुष्पा २ द रुल या चित्रपटाला हजेरी लावलेल्या प्रेक्षकांनी या घटनेवर एएनआयशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रेक्षकाने म्हटले की, “मध्यांतर झाल्याने आम्ही थिएटरबाहेर आलो होतो. पण पुन्हा आत गेल्यानंतर कोणतही काहीतर फवारल्यामुळे अनेक प्रेक्षक खोकत असल्याचे दिसले. त्यानंतर १० मिनिटे चित्रपटाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.” दुसऱ्या एका यूजरने “मध्यांतरानंतर परत जाताच आम्हाला खोकला येऊ लागला. आम्ही बाथरूममध्ये जाऊन उलट्या केल्या. १०-१५ मिनिटे गॅसचा वास तसाच राहिला. दरवाजे उघडल्यानंतर वास नाहीसा झाला. त्यानंतर चित्रपट पुन्हा सुरू झाला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Sacnilk.com दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १० वाजता या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये प्रदर्शन झाले. पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास १६० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी राम चरण, ज्युनिअर एनटीआर यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने पहिल्या दिवशी १३३ कोटींची कमाई केली होती. पुष्पा २ या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या सर्वाधिक कमाईमध्ये तेलुगू भाषेचा ८०.१४ टक्के भाग आहे.
वाचा: रवींद्र महाजनींच्या पत्नीच्या मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे, वाचा नेमकं काय झालं होतं?
सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेकावत यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला पहिल्या भागातील अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. चित्रपटात लाल चंदन तस्करीच्या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्ष दाखवण्यात आला होता.