Antarpat Serial: गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी, 'अंतरपाट' मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Antarpat Serial: गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी, 'अंतरपाट' मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी!

Antarpat Serial: गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी, 'अंतरपाट' मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी!

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 27, 2024 12:31 PM IST

Antarpat Serial: 'अंतरपाट' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील गौतमी आणि क्षितिजची कथा दाखवण्यात आली आहे. आता मालिकेच्या सेटवर कांदाभजीची पार्टी करण्यात आली आहे.

Antarpat Serial
Antarpat Serial

पावसाळा सुरु झाला की पडणारा पाऊस हवेत गारवा आणतो. त्यामुळे प्रत्येकाला चहा आणि गरमागरम भजी खाण्याची इच्छा होतेच. मग यात सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'अंतरपाट' या मालिकेतील कलाकारांनाही कांदा भजी खाण्याचा मोह आवरला नाही. म्हणून चक्क मालिकेतील गौतमी-क्षितिज अर्थात रश्मी अनपट आणि अशोक धगे यांनीच किचन हाती घेतलं आणि आपल्या संपूर्ण टीमला कांदाभजीची मेजवानी दिली. त्यामुळे साहजिकच कांदाभजी खात 'अंतरपाट' मालिकेच्या टीमने पावसाचा आनंद लुटला.

'अंतरपाट' या मालिकेत गौतमी म्हणजेच रश्मी अनपट आणि क्षितिज यांची कथा दाखवण्यात आली आहे. दुसऱ्या मुलीवर प्रेम असताना देखील क्षितिज गौतमीशी लग्न करतो. पण हे गौतमीला माहिती असून देखील ती त्याच्यासोबत असलेले नाते निभावण्यास तयार होते. आता मालिकेत पुढे काय लिहिले आहे हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. दरम्यान, मालिकेच्या सेटवर पावसाळ्यात धमाल सुरु असल्याचे पाहायला मिळाले.

'अंतरपाट' मालिकेच्या सेटवर कांदा भजी बनवण्यासाठी रश्मी अनपट आणि अशोक धगे यांनी पुढाकार घेतला. याविषयी बोलताना रश्मी म्हणाली, "पाऊस आणि कांदाभजी हे माझं ठरलेलं समीकरण आहे. पुण्यात असताना पावसाळ्यात सिंहगडावर मी खास कांदाभजी खायला जायचे. पण यंदा शूटमुळे सिंहगडावर जाऊन कांदाभजी खाणं शक्य नाही. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे रात्री घरी जाऊन कांदाभजी बनवणंदेखील शक्य होत नाही. त्यामुळे मी माझं दुसरं कुटुंब अर्थात 'अंतरपाट' मालिकेच्या टीमसोबत शूटिंगदरम्यानच कांदाभजीचा आस्वाद घेण्याचं ठरवलं."
वाचा: 'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया

पुढे ती म्हणाली, "मी आणि अशोकने कांदाभजी बनवण्याचं ठरवल्यानंतर स्पॉट दादांनी आम्हाला त्यासाठी लागणारी सर्व सामग्री आणून दिली. मग मी आणि क्षितिजने आमच्या संपूर्ण युनिटसाठी मस्त गरमा गरम कांदाभजी बनवली. सगळ्यांनी एकत्र बसून कांदाभजीचा आस्वाद घेतला. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. आम्ही दोघांनी बनवलेली कांदा भजी संपूर्ण युनिटला आवडली. खरंतर आम्ही मजा, मस्ती करत कांदाभजी बनवली आणि त्यावर ताव मारला. 'अंतरपाट' मालिकेच्या सेटवरची ही पावसाळी मेजवानी मी कधीही विसरू शकत नाही."

'अंतरपाट' मालिकेविषयी

लग्नाच्या पहिल्या रात्रीच क्षितिज गौतमीला त्याचं जान्हवीवर प्रेम असल्याचं सत्य सांगितले आहे. त्यानंतर त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होते. आता क्षितिजचं गौतमीसोबत लग्न झालेलं असलं तरी त्याच्या मनात अजूनही पूर्वीची प्रेयसी जान्हवीची जागा कायम आहे. जान्हवीचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही, हे त्याच्या मनात पक्के आहे. तरीसुद्धा, गौतमीने या नात्यात मैत्रीचे बीज पेरण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच क्षितिजने सत्य सांगितल्यानंतरही गौतमीने धीर सोडलेला नाही.

Whats_app_banner