Mohammed Rafi Birth Anniversary : 'ये रेशमी जुल्फें', 'क्या हुआ तेरा वादा', 'तुम मुझे यूं भुला ना पाओगे' ही मोहम्मद रफी यांची अशी अनेक गाणी आहेत, जी त्यांनी आपल्या मखमली आवाजाने सजवली आहेत. रफी साहेबांची कव्वाली, सूफी, रोमँटिक आणि दर्दभरी गाणी आजही लोकांच्या जिभेवर रेंगाळतात. संगीत सृष्टीतील दिग्गज मोहम्मद रफी यांची कारकीर्द तीन दशकांची आहे. हजारो गाणी रेकॉर्ड केलेल्या या दिग्गज गायकाला एक गाणे रेकॉर्ड करताना आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि रडतच त्यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग केले.
१९६६मध्ये दिग्दर्शक राम महेश्वरी यांनी 'नील कमल' नावाचा चित्रपट बनवला होता. वहिदा रहमान, राजकुमार आणि मनोज कुमार यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान मोहम्मद रफी ढसाढसा रडू लागले होते. आजही ते गाणं ऐकून लोक रडतात.
५७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे ते सुपरहिट गाणे म्हणजे 'बाबुल की दुआं लेती जा', ज्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान अचानक रफी साहेब ओक्साबोक्सी रडू लागले. त्यांचे अश्रू थांबत नव्हते आणि हे दृश्य पाहून तिथले सगळेच थक्क झाले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडत होता की, रफी साहेबांना नक्की काय झाले? अखेर स्वतः मोहम्मद रफी यांनी सगळ्यांना कारण सांगितलं.
अखेर मोहम्मद रफी यांनी आपल्या अश्रूंची कहाणी सांगितली. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या अगदी आधीच त्यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. आणि अवघ्या २ दिवसांनी त्यांच्या मुलीचे लग्न होते. ५० वर्षांपूर्वी 'शमन मॅगझिन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, 'मी गाणे रेकॉर्ड करत होतो आणि माझ्या मुलीच्या लग्नाचे दोन दिवसांनी होणारे सीन मी मानसिकदृष्ट्या त्यावेळी पाहत होतो. त्या क्षणांच्या भावनांनमध्ये मी इतका वाहून गेलो होतो की, त्या डोलीत बसून माझी मुलगी माझ्यापासून वेगळी होत आहे, असे मला वाटले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या स्थितीत मी हे गाणे रेकॉर्ड केले. खरं तर, या गाण्याच्या शब्दांमुळे माझ्या डोळ्यांत अश्रू आले.
संबंधित बातम्या