Marathi Natak Karun Gelo Gaav: गेल्या महिन्यांत पावसाने आपलं रौद्र रूप दाखवलं. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. यावेळी रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडी गावात मोठी दुर्घटना घडली. या गावात मोठी दरड कोसळल्याने संपूर्ण गाव एका रात्रीत नाहीसे झाले. या घटनेला आता बरेच दिवस उलटून गेले असून, आता गावकरी यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि त्यांचे संसार पुन्हा एकदा नव्याने उभे करण्यासाठी नाट्य निर्माते राहुल भंडारे आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी मदतीचा हात दिला आहे.
‘अद्वैत थिएटर आणि अश्वमी थिएटर निर्मित ‘करून गेलो गाव’ या नाटकाचा नुकताच अमृत महोत्सवी प्रयोग पार पडला. या निमित्ताने ३ प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. १५ ऑगस्ट रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे हे खास प्रयोग पार पडले. या नाटकाच्या तीनही प्रयोगांच्या उत्पन्नापैकी ठराविक रक्कम इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. आता हे प्रयोग पार पडले असून, यातून एक लाख रुपयांचा मदत निधी इर्शाळवाडीसाठी देण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे लाडके अभिनेते भाऊ कदम आणि ओंकार भोजणे यांच्या ‘करून गेलो गाव’ या नाटकाचा अमृत महोत्सवी प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे संपन्न झाला. अमृत महोत्सवी प्रयोगानिमित्ताने निर्मात्यांनी तीन प्रयोगांचे आयोजन या दिवशी केले होते. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने करून गेलो गाव नाटकाचे निर्माते राहुल भंडारे आणि महेश वामन मांजरेकर यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी कर्तव्यनिधी म्हणून एक लाखाचा धनादेश आमदार आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्द केला. या तीनही प्रयोगांना रसिक प्रेक्षकांनीही उदंड प्रतिसाद दिला.
रायगडमधील निसर्ग संपन्न असं इर्शाळवाडी हे गाव एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. पावसामुळे कोसळलेल्या दरडीने संपूर्ण गावच नाहीसं झालं. गावात असलेली सगळीच घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली उद्ध्वस्त झाली. या संकटातून इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आता अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.
संबंधित बातम्या