मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'उठ सूठ कोणीही उपरा काहीही बोलतो...', राज्यपालांच्या वक्तव्यावर गिरीश ओक संतापले

'उठ सूठ कोणीही उपरा काहीही बोलतो...', राज्यपालांच्या वक्तव्यावर गिरीश ओक संतापले

Payal Shekhar Naik HT Marathi
Jul 31, 2022 01:17 PM IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsingh koshyari statment on mumbai)यांनी नुकत्याच केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आता अभिनेते गिरीश ओक (girish oak)यांनीही महाराष्ट्र पोरका झाला आहे म्हणत यावर आपला संताप व्यक्त केला आहे.

गिरीश ओक
गिरीश ओक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. 'मुंबईमधून राजस्थानी आणि गुजराती निघून गेल्यास मुंबईत पैसे राहणार नाही' असं वक्तव्य त्यांनी भर सभेत केलं होतं. त्यावरून अनेक राजकारण्यांनी देखील त्यांना विरोध केला. मुंबई ही मराठी माणसाच्या कष्टामुळे चालते गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या पैशामुळे नाही, असं म्हणत अनेकांनी त्यांना खडे बोल सुनावले. अनेकांनी त्यांच्याकडून माफीची मागणी केली. अशातच मराठमोळे अभिनेते गिरीश ओक यांनी याप्रकरणी त्यांचं मत मांडलं आहे. राजकारण्यांनी महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट करून ठेवली आहे असं ते म्हणाले आहे.

यापूर्वी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची वागणूक कशी होती आणि आता राजकारणी काय करत आहेत यामधील फरक दाखवत त्यांनी लिहिलं, 'आई बाप भाऊ बहीण नसलेल्या मुलाची जी अवस्था होते त्याला उठ सूठ कोणीही उपरा काहीही बोलतो त्याच्या बाजूनी बोलणारं कोणीच नसतं तशी केवीलवाणी अवस्था करून ठेवलीये आपल्या महाराष्ट्राची ह्या राजकारण्यांनी. माझ्या मुला/मुली कडे कोणी वाईट नजरेनी बघू दे डोळे फोडून टाकीन. वाईट बोलू दे जीभ हासडून टाकीन. कोणी बोट दाखवू दे ते बोट छाटून टाकीन. ही भावना होती महाराष्ट्र निर्मितीतल्या योध्द्यांची हुतात्म्यांची. त्यांना आज काय वाटंत असेल. आणि मराठीवर महाराष्ट्रावर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्या असंख्य मराठी माणसांना.'

ओक यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

IPL_Entry_Point