Manish Malhotra Birthday : बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आज (५ जानेवारी) आपला वाढदिवस साजरा करत आहे. मनीष मल्होत्रा आज जरी अतिशय आलिशान आयुष्य जगत असला, तरी त्याने आधी खडतर जीवन पाहिले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर एक नजर टाकूया...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक हिट अभिनेता-अभिनेत्रीला आपल्या पोशाखांनी लुक देणाऱ्या मनीष मल्होत्राला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. परिणीती चोप्रापासून कियारा अडवाणीपर्यंत - जवळजवळ प्रत्येक सेलिब्रिटीने त्यांचे शाही लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी मनीष मल्होत्राची मदत घेतली आहे. आज इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावणाऱ्या मनीष मल्होत्राचा हा प्रवास सोपा नव्हता.
५ डिसेंबर १९६६ रोजी मुंबईतील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या मनीष मल्होत्राच्या कुटुंबात अभ्यासाला जास्त महत्त्व दिले जात होते. मात्र, मनीषला अभ्यासात अजिबात रस नव्हता. त्याचा कलेकडे अधिक ओढा होता. यात त्याच्या आईने त्याला पूर्ण साथ दिली. मनीष नेहमी म्हणतो की, तो लहानपणापासूनच अभ्यासात खूप वाईट होता, कारण त्याला अभ्यास कंटाळवाणा वाटायचा. मात्र, नंतर त्याने आर्ट आणि डिझायनिंग करायला सुरुवात केली.
मनीष मल्होत्राने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो लहानपणापासूनच आईला साडी खरेदी करण्यात मदत करत असे. कॉलेजमध्ये असताना मनीष मल्होत्रा एका बुटीकमध्ये काम करू लागला, जिथे त्याला फक्त ५०० रुपये मिळायचे. याच काळात त्याला डिझायनिंग जवळून समजले आणि इथूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. आज, कठोर परिश्रम आणि प्रयत्नांनंतर, मनीष मल्होत्रा प्रत्येक सेलिब्रिटीच्या यादीत आहे आणि प्रत्येक नववधू आपल्या लग्नात मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला पोशाख घालण्याचे स्वप्न पाहते.
मनीष मल्होत्राला 'स्वर्ग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ओळख मिळवली. गोविंदा, राजेश खन्ना आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आणि चित्रपटाच्या कपड्यांच्या डिझाईननेही मनीषचे नाव गाजवले. त्यानंतर त्याला चित्रपटांसाठी काम मिळू लागले. १९९३मध्ये 'गुमराह' या चित्रपटातून त्याला आणखी प्रोत्साहन मिळाले. पण, १९९६मध्ये रिलीज झालेल्या 'रंगीला' या चित्रपटाने कमाल केली. या चित्रपटासाठी मनीष मल्होत्राला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा पुरस्कार मिळाला. एखाद्या कॉस्च्युम डिझायनरला पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर मनीषने कधीच मागे वळून पाहिले नाही.
संबंधित बातम्या