Lakhat Ek Aamcha Dada: नुकत्याच नव्याने छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या मालिकांमध्ये ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने एक वेगळी आणि खास सुरुवात केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनवर असं काही घडलं, जे या आधी प्रेक्षकांनी मराठी टेलिव्हिजनवर कधीच अनुभवलं किंवा पाहिलंही नसेल. 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिला भाग पाहताच प्रेक्षकांनी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला. सोशल मीडियावर देखील या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या पहिल्याच भागात प्रेक्षकांना एक वेगळीच अनोखी घटना टीव्हीवर पाहायला मिळाली आहे. जो क्षण आणि जो सीन प्रेक्षकांच्या हृदयात आणि मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात कोरला गेला, तो म्हणजे सूर्यादादाचा यात्रेमधला पालखीचा धमाकेदार सीन. नितीश चव्हाणसाठी एक अभिनेता म्हणून तो सीन साकारण्याचा अनुभव कसा होता, हे त्याने नुकतेच सांगितले आहे. यात्रेमधील पालखीचा हा सीन शूट करणं नितीश चव्हाणसाठी अजिबात सोपं नव्हतं.
या सीनबद्दल बोलताना नितीश चव्हाण म्हणाला की, ‘जेव्हा मला कळलं की, यात्रेमधला असा एक सीन करायचा आहे, तेव्हापासून मनात धाकधूक चालू होती. हा सीन कसा होईल, काय वेगळं करता येईल, हे विचार सतत डोक्यात चालू होते. जेव्हा तो दिवस आला, तेव्हापर्यंत मी काहीही ठरवलं नव्हतं. कारण अंगात येणं हे मी आजपर्यंत कधीच अनुभवलं नव्हतं. म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं याची कल्पना नव्हती. जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि तयार होऊन जेव्हा स्वतःला पहिल्यांदा आरशात पाहिलं, ते पाहून माझा आत्मविश्वास वाढला. इतका कमाल लूक पाहून ती भावना जागृत झाली की, मी काहीतरी वेगळं करायला चाललो आहे. यासाठी मला मेकअप दादांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. सीनसाठी मी तयार झालो आणि सर्वात आधी देवीसमोर जाऊन तिचा आशीर्वाद घेतला आणि तिला प्रार्थना केली की, मला माहिती नाही कसं करायचं, काय करायचं, तू माझ्याकडून हे सर्व नीट करून घे.’
पुढे नितीश म्हणाला की, ‘मी पहिला टेक केला आणि तो संपल्यानंतर सर्वानी टाळ्यांचा गजर केला. सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की, वाटलंच नाही तू नितीश आहेस आणि तू अभिनय करतोयस, असं वाटत होत की खरंच तुझ्या अंगात आलंय. श्वेता मॅडमने येऊन मिठी मारली, किरण सर आमचे दिग्दर्शक आले आणि म्हणाले बस तू फक्त एपिसोड बघ आता. सीन पूर्ण झाल्यावर परत एकदा देवीच्या चरणी गेलो आणि तिचे आभार मानले की, माझ्याकडून हे तूच करवून घेतलं आहेस. आमचं त्या दिवशीच शूटिंग संपल्यावरही परत मी परत देवीला भेटायला गेलो आणि ती माझ्या पाठीशी उभी राहिली याबद्दल आभार मानले. कारण हे फक्त तिच्यामुळेच मी करू शकलो.
देवीच्या पालखीबद्दल सांगताना नितीश म्हणाला की, ‘२० किलोची देवीची पालखी होती आणि आर्ट दादांनी तर कमालच केली होती. २० किलोची पालखी आणि तो पेहराव त्यासोबत डायलॉग्स बोलायचे हे सगळं करण्यात दमछाक होतं होती. एक-दोनदा मला चक्करही आली. पण, तरी ही मी थांबलो नाही. कारण, ती एक ऊर्जा आणि शक्ती अंगात होती. ही सगळी ऊर्जा देवींनीच दिली, असं मी मानतो आणि ती पाठीशी होती म्हणून यशस्वीपणे मी हा सीन निभावू शकलो, ज्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळत आहे.’
संबंधित बातम्या