KBC 15: शरीरात ३००हून अधिक फ्रॅक्चर तरीही संयमी खेळ! थोडक्यात हुकली राहुलची १ कोटी जिंकण्याची संधी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 15: शरीरात ३००हून अधिक फ्रॅक्चर तरीही संयमी खेळ! थोडक्यात हुकली राहुलची १ कोटी जिंकण्याची संधी

KBC 15: शरीरात ३००हून अधिक फ्रॅक्चर तरीही संयमी खेळ! थोडक्यात हुकली राहुलची १ कोटी जिंकण्याची संधी

Published Aug 19, 2023 09:18 AM IST

KBC 15 Latest Update: राहुल ज्या पद्धतीने मन शांत ठेवून आणि संयमीपणे प्रश्नांची उत्तरे देत होता, ते पाहून खुद्द अमिताभ बच्चनही थक्क झाले.

Rahul Nema-Amitabh Bachchan
Rahul Nema-Amitabh Bachchan

KBC 15 Latest Update: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती'चा १५वा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अवघ्या दोन एपिसोड्समध्येच या पर्वात १ कोटींच्या फेरीपर्यंत पोहोचणारा पहिला स्पर्धक राहुल कुमार नेमा ठरला. मात्र, राहुल कुमारचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. १७ ऑगस्ट रोजी फास्टेस्ट फिंगरची पहिली फेरी जिंकल्यानंतर राहुल कुमार अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसला होता. या एपिसोडमध्ये १० प्रश्नांची अचूक उत्तरे देत त्याने ३ लाख २० हजार रुपये जिंकले. यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा खेळ सुरू झाला.

राहुल ज्या पद्धतीने मन शांत ठेवून आणि संयमीपणे प्रश्नांची उत्तरे देत होता, ते पाहून खुद्द अमिताभ बच्चनही थक्क झाले. केबीसीच्या सेटवर उपस्थित असलेल्या अनेकांना वाटत होते की, ३१ वर्षीय राहुल या खेळात १ कोटी रुपये नक्की जिंकेल. मात्र, १ कोटीच्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने राहुलने ५० लाख रुपये घेऊन हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. राहुल हा मध्य प्रदेश राज्यातील भोपाळच्या ग्रामीण बँकेच्या शाहपुरा शाखेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो.

‘केबीसी १५’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सहभागी झालेल्या ३१ वर्षीय राहुलची उंची ३ फुटांपेक्षा कमी आहे. लहानपणापासून त्याला एक अनुवांशिक आजार आहे, या आजाराचे नाव 'ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा' असे आहे. या अंतर्गत त्याच्या शरीरात ३००हून अधिक फ्रॅक्चर आहेत. तरीही त्याने या सगळ्या परिस्थितीसमोर हार मानली नाही. राहुलने आपले शिक्षण पूर्ण केले आणि न डगमगता आपल्या आयुष्यात पुढे गेला. संपूर्ण भोपाळमध्ये तो सगळ्यांचा लाडका बनला आहे. संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर एखादा व्यक्ती काय करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणून राहुलचे नाव घेतले जाते. ‘केबीसी १५’मध्ये आल्यानंतर संपूर्ण देश राहुलच्या या जिद्दीने अवघा देश प्रेरित झाला आहे.

Whats_app_banner