Kangana Ranaut: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर कंगनाचं भाष्य; म्हणाली ‘त्यांनी माझं घर तोडलं तेव्हाच...’
Kangana Ranaut Tweet : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच सगळ्यांवर टीकास्र सोडत असते.
Kangana Ranaut Tweet : महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलंच ढवळून निघालं आहे. नुकताच निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय सुनावत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. ‘शिवसेना’ या नावावर आणि ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर आता उद्धव ठाकरेंचा अधिकार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाकडे सोपवले आहे. खासदार आणि आमदारांच्या बहुमताच्या आधारे शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या निर्णयावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता अभिनेत्री कंगना रनौतनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच सगळ्यांवर टीकास्र सोडत असते. आता देखील कंगनाने असे एक ट्वीट केले आहे. कंगना रनौत हिने उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर उपरोधिक ट्वीट केले आहे. यावेळी तिने बीएमसीने तिच्या मुंबईतील घरावर बुलडोझर चालवला होता, तेव्हाच्या प्रसंगाची आठवण देखील करून दिली आहे.
कंगनाचे हे ट्वीट सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. कंगना रनौतने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'देवांचा राजा इंद्रसुद्धा त्याच्या कुकर्मांमुळे स्वर्गाच्या गाडीवरून पाय उतार झाला होता. हे तर फक्त एक नेता आहेत. जेव्हा त्यांनी माझे घर अन्यायाने पाडले होते, तेव्हा मला समजले की, आता लवकरच हे देखील पडणार आहेत. देव चांगल्या कर्माने पुन्हा आपली गाडी मिळवू शकतात. पण, स्त्रियांचा अपमान करणारा नीच पुरुष कधीच नाही... आता पुन्हा ते कधीच उठणार नाहीत.'
गेल्या काही महिन्यापासून खरी शिवसेना कोणाची व धनुष्यबाणावर कोणाचा निर्णय याबाबत उद्धव गट आणि एकनाथ शिंदे गटात निवडणूक आयोगात लढत सुरू होती. शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष आता खरी शिवसेना म्हणून ओळखली जाणार आहे.