आज संपूर्ण देशाचे लक्ष २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. यावेळीही अनेक चित्रपट सेलेब्स निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कंगना रनौत आणि पवन सिंह यांसारखे काही नवे चेहरे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर काही सेलिब्रिटी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाचा भाग आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा फिल्मी स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी राजकारणात प्रवेश करत शानदार विजय मिळवला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर कदाचित हे सेलिब्रिटी चित्रपटसृष्टी सोडतील, अशी लोकांना अपेक्षा होती. पण या सेलिब्रिटींनी राजकारणासोबतच चित्रपटसृष्टीतही आपली यशस्वी कारकीर्द सुरू ठेवली. पाहूया कोण आहेत हे कलाकार...
भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार रवी किशन यांनी २०१९मध्ये भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. पूर्वी ही जागा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला होती. पण, २०१७ मध्ये त्यांनी ही जागा सोडली. आता रवी किशन गोरखपूरचे खासदार आहेत आणि चित्रपटांमध्येही सक्रिय आहेत. याशिवाय रवि किशन ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली प्रतिभा दाखवत आहेत.
भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव उर्फ निरहुआने इंडस्ट्रीत अनेक चित्रपट दिले आहेत. सध्या हा अभिनेता चित्रपटांसोबतच राजकारणातही सक्रिय आहे. अभिनेता निरहुआ उत्तर प्रदेशातील आझमगडचा खासदार आहे.
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी देखील राजकारणाच्या रिंगणातील जुना चेहरा आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरेच्या खासदार आहेत आणि यावेळीही त्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मथुराचे प्रतिनिधित्व करत आहेत. याशिवाय अभिनेत्री काही प्रमाणात चित्रपटांमध्येही सक्रिय आहेत.
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षांपूर्वी राजकारणात नशीब आजमावले होते. त्यांनी १९८४मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली होती. बिग बींनी लोकसभा निवडणूकही जिंकली. मात्र, नंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली. सध्या दिग्गज कलाकार म्हणून ते चित्रपटांमध्ये आघाडीवर आहेत.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. अभिनेते धर्मेंद्र यांनी २००४मध्ये राजस्थानमधील बिकानेर शहरातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि प्रचंड विजय मिळवला होता. नंतर, धर्मेंद्र यांनी राजकारणाला अलविदा करून आपला चित्रपट प्रवास सुरू ठेवला.
बॉलिवूड अभिनेता सनी देओलने २०१९च्या निवडणुकीत राजकीय प्रवासाला सुरुवात केली. या अभिनेत्याने पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि खासदार बनला होता. अभिनेता चित्रपटांमध्ये भरपूर सक्रिय आहे. परंतु, गेल्या वर्षी त्याने जाहीर केले होते की, तो २०२४ची निवडणूक लढवणार नाही.
संबंधित बातम्या