Hardik Joshi upcoming movie: ‘राणा दा’ बनून महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता हार्दिक जोशी नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच हार्दिक सूत्रसंचालन करत असलेल्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता हार्दिक कोणत्या चित्रपटातून किंवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सध्या सोशल मीडियावर 'काका मला वाचवा' असे बोलताना हार्दिक दिसत आहे. नेमकं असं काय झालं आहे? असा प्रश्न चाहत्यांना सतातवत आहे. या प्रश्नाचे उत्तर ८ मार्चला प्रेक्षकांना मिळणार आहे.
हार्दिक जोशी हा लवकरच 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो काकाच्या पुतण्याची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे त्याचा चित्रपटातील 'काका मला वाचवा' हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: अभिनेता विद्युत जामवालाला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?
अभिनेता हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचे छायांकन केले आहे. चित्रपटाच्या नावातच लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटातून करोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचे स्पष्ट होते. त्याशिवाय लग्नाशी संबंधित विषय असल्याने काहीतरी मजेदार पहायला मिळणार यात शंका नाही.
हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर हे दोघंही कसलेले अभिनेते आहेत. काका-पुतण्याच्या भूमिकेत असलेल्या या दोघांनी या चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. काका पुतण्यासाठी काय करतो? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हार्दिक जोशी 'काका मला वाचवा' अशी साद सुनील अभ्यंकर यांना का घालत आहे, याचे उत्तर मिळण्यासाठी थोडेच दिवस थांबावं लागणार आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर हार्दिक जोशी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत देखील झळकला होता. या मालिकेत त्याने शुभंकर नावाचे पात्र साकारले होते. त्याचा पात्राची मालिकेत दोन वेळा एण्ट्री झाली होती. त्यानंतर हार्दिक जाऊ बाई गावात या शोचे सूत्रसंचालन करताना दिसला. त्याच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता हार्दिक 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
संबंधित बातम्या