Hardeek Joshi Cried On National TV: टीव्ही विश्वाचा लाडका ‘राणा दा’ म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी सध्या ‘जाऊ बाई गावात’ या हटके शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमध्ये केवळ देशातील नाही तर, परदेशात वास्तव्य करणाऱ्या काही तरुणी भारतात येऊन महाराष्ट्रातल्या बावधन या गावात राहत आहेत. अतिशय लक्झरी आयुष्य जगणाऱ्या या तरुणी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात येऊन तिथल्या लोकांसोबत राहून तांबड्या मातीचा अनुभव घेत आहेत. अगदी सुखवस्तू कुटुंब आणि ऐशोआरामाचं जगणं सोडून या तरुणींना गावातल्या मातीत राबावं लागत आहे. या हटके विषयाच्या शोमध्ये आता भावनिक वातावरण पाहायला मिळणार आहे. तर, यावेळी एका खास व्यक्तीच्या आठवणीत हार्दिक जोशी याच्या अश्रूंचा बांध देखील फुटणार आहे.
‘जाऊ बाई गावात’ या शोच्या आगामी भागात ‘पोस्टमन काका’ म्हणजेच अभिनेता सागर कारंडे हा काही पत्र घेऊन स्पर्धकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टमन काका आल्यामुळे आता दूर असलेले आपले आई वडील आणि आपलं घर यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. यावेळी पोस्टमन काका आपल्या आठवणींच्या पिशवीतून काही खास पत्र काढून वाचून दाखवणार आहेत. पोस्टमन काकांच्या आवाजातून प्रत्येकालाच आपल्या जवळच्या लोकांची भेट घडणार आहे. तर, या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात पाणी येणार आहे.
यावेळी अभिनेता सागर कारंडे म्हणजेच पोस्टमन काकांच्या या पिशवीतून सूत्रसंचालक हार्दिक जोशी याच्यासाठी देखील एक खास पत्र बाहेर निघणार आहे. ‘तू स्ट्रगल करत असताना माझ्याकडून पैसे घ्यायचास, याचा तुलाच संकोच वाटायचा. पण, तू यशस्वी झालास तेव्हा तुम्ही राणादाच्या वहिनी ना? असं विचारलं की मला खूप आनंद व्हायचा’, असं या पत्रात लिहिलं होतं. हे ऐकताच अभिनेता हार्दिक जोशी याच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तो ढसाढसा रडू लागला. पोस्टमन काकांनी आणलेलं हे पत्र हार्दिक जोशीच्या वहिनीचं होतं. काहीच दिवसांपूर्वी हार्दिक जोशीच्या वहिनीचं अल्पशा आजाराने निधन झालं होतं.
आपल्या वहिनीच्या आठवणींना उजाळा देताना हार्दिक जोशी म्हणाला की, ‘तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावला होता. तिला बोलता सुद्धा येत नव्हतं, तरी तिने म्हटलं की, माझी शपथ आहे तुला हा शो सोडून नकोस.’ वहिनीच्या आजारपणाच्या काळातच हार्दिक जोशी याला ‘जाऊ बाई गावात’ची ऑफर आली होती. तर, वहिनीची शेवटची इच्छा म्हणून त्याने हा शो स्वीकारला होता.
संबंधित बातम्या