Happy Birthday Rajinikanth : अभिनेते रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. जगभरातील चाहते त्यांना प्रेमाने 'थलायवा' म्हणतात. रजनीकांत हे नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. आज (१२ डिसेंबर) सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस आहे. चाहते रजनीकांत यांची देवाप्रमाणे पूजा करतात. पण, एक वेळ अशी आली होती की, एका निर्मात्याने त्यांचा सगळ्यांसामोर अपमान केला होता.
रजनीकांत यांच्या 'दरबार' चित्रपटाचे म्युझिक जानेवारी २०२०मध्ये लाँच झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील हा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला होता.मात्र, त्यांनी कुणाचही नाव न घेता आपला कशा पद्धतीने अपमान झाला यांचा संपूर्ण किस्सा सांगितला होता.
साधारण १९७० सालची ही गोष्ट आहे. जेव्हा रजनीकांत यांची एका प्रोजेक्टसाठी निवड झाली होती. या चित्रपटात त्यांना चांगली भूमिका मिळाली होती. या चित्रपटासाठी त्यांना किती मानधन मिळणार याची चर्चाही आधीच झाली होती. या भूमिकेसाठी त्यांना ६००० रुपये मिळणार हे ठरले होते. ६००० रुपये त्याकाळी खूप जास्त होते. अशा परिस्थितीत रजनीकांतने निर्मात्याकडून काही पैसे आगाऊ मागितले, ज्यामुळे ही भूमिका आपल्यालाच मिळतेय यावर शिक्कामोर्तब होईल. हे प्रकरण शूटिंगच्या दिवसापर्यंत पोहोचले, पण तरीही रजनीकांत यांना पैसे देण्यात आले नाहीत.
शूटिंगच्या दिवशी ॲडव्हान्स न मिळाल्याने रजनीकांत यांनी निर्मात्याला फोन केला. फीचा काही भाग देण्याविषयी त्यांच्यात बोलणं झालं. यानंतर रजनीकांत यांना लवकरच पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी, निर्मात्याने रजनीकांतला मेकअपसाठी जाण्यास सांगितले, तेव्हा रजनीकांत यांनी आगाऊ पैसे घेण्याआधी पुढे जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावर तो म्हणाला की, प्रॉडक्शन मॅनेजरने मला सांगितले की हिरो आला आहे आणि त्याला मेकअपसाठी बसावे लागेल. मात्र, तुम्ही आता नकार देताय. यावर रजनीकांत सरल म्हणाले की, मी १००० रुपये घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही.
रजनीकांत यांनी मेकअप करण्यापूर्वी आगाऊ पैसे मागितल्याने निर्माता खूश नव्हता. त्याने सगळ्यांसमोर रजनीकांत यांचा खूप अपमान केला. ॲम्बेसेडर कारमध्ये आलेल्या निर्मात्याने सर्वप्रथम त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. निर्मात्याला खूप राग आला होता. त्या निर्मात्याने रजनीकांत यांना विचारले, 'कोण आहेस तू? तू मोठा कलाकार आहेस का? आगाऊ पैसे घेतल्याशिवाय मेकअप करायला बसणार नाही का? निघ इथून..तुझ्यासाठी कोणतेही पात्र नाही, सरळ बाहेर निघून जा.'
या घटनेनंतर रजनीकांत यांना पायी घरी परतावे लागले. कारण निर्मात्याने घरी परतण्यासाठी त्याची कार देण्यास नकार दिला होता. मात्र, परतत असताना रजनीकांत यांच्या लक्षात आले की, रस्त्यावरील लोकांनी त्यांना लगेच ओळखले. चाहत्यांचे हे प्रेम रजनीकांत यांच्या जखमेवरचे मलम ठरले.
संबंधित बातम्या