Happy Birthday Prabhas : 'सोच अगर पक्की हो तो तिनका भी तलवार में बदल सकता है...' हा चित्रपटातील संवाद असला तरी कोणत्याही छोट्या चित्रपटातील नाही. हा संवाद त्या चित्रपटाचा आहे, ज्याने साऊथ सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला. 'बाहुबली' बद्दल बोलत असताना, पहिले नाव डोळ्यांसमोर येते ते म्हणजे अभिनेता प्रभास. आपल्या दमदार आवाजाने आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाने चित्रपटाचे संवाद आणखीनच प्रभावी बनवणाऱ्या प्रभासचा हा डायलॉग त्याच्या आयुष्याशी अगदी चपखल बसतो. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी...
२३ ऑक्टोबर १९७९ रोजी मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या प्रभासला चित्रपटांमध्ये अजिबात रस नव्हता. लहानपणापासून चित्रपटांशी जोडलेल्या लोकांमध्ये राहूनही प्रभासचे मन चित्रपटाकडे वळले नव्हते, तर त्याला व्यवसाय करायचा होता. अभिनेत्याला सुरुवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय उघडून पुढे जायचे होते, परंतु नशिबात काहीतरी वेगळेच होते. प्रभासने अचानक बिझनेसमन होण्याचे स्वप्न सोडून अभिनेता होण्याचे का ठरवले, यामागेही एक किस्सा आहे.
बिझनेसमन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मोठा झालेल्या प्रभासचा कायापालट त्याच्या काकांनी केला. अभिनेत्याचे काका एक चित्रपट बनवत होते, ज्याच्या नायकाच्या रुपात प्रभास एकदम फिट होता. अशा परिस्थितीत काकांनी विनवणी करून प्रभासची समजूत घातली आणि अशा प्रकारे त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. प्रभासने २०००साली प्रदर्शित झालेल्या 'ईश्वर' चित्रपटातून पदार्पण केले. पण, हा चित्रपट फार जादू दाखवू शकला नाही. मात्र, अभिनेत्याचा दुसरा चित्रपट 'वर्षम' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी झाला. यानंतर प्रभासने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी काही हिट तर काही फ्लॉप ठरले.
हिट आणि फ्लॉपची ही मालिका सुरू होती, तितक्यात प्रभासला एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटाची ऑफर आली. हा चित्रपट साईन करण्याआधी अभिनेत्यासमोर एक अट ठेवण्यात आली होती, ती म्हणजे तो पाच वर्षे इतर कोणत्याही प्रोजेक्टवर काम करणार नाही. प्रभासने ही अट स्वीकारण्याचा धोका पत्करला आणि 'बाहुबली' बनून संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली. प्रभासच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा हिट ठरला, ज्याने त्याला नवीन उंचीवर नेले आणि तो केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध झाला. पाच वर्षे कोणताही चित्रपट साईन न केल्यामुळे प्रभासला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागले. पण 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'च्या यशाने सर्व काही ठीक झाले.
या दोन चित्रपटांनी प्रभासच्या करिअरवरच नव्हे, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रभाव टाकला. प्रभासला अचानक देशातील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ बनवण्यात आले. बाहुबलीची चाल, लूक आणि राजेशाही वागणूक पाहून प्रभावित होऊन देशभरातील सुमारे ६००० मुलींनी प्रभासला लग्नाचे प्रस्ताव पाठवले होते. 'बाहुबली २'च्या यशानंतर प्रभासला ६००० मुलींकडून प्रपोजल आले होते, पण प्रभासने सगळे प्रस्ताव नाकारत या मुलींची ह्रदयं तोडली.
संबंधित बातम्या