‘हेरा फेरी’चे ‘बाबू भैय्या’ असोत वा ‘वेलकम’चे ‘घुंगरू सेठ’ किंवा ‘हंगामा’चे राधेश्याम तिवारी... उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते परेश रावल आज त्यांचा ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत. परेश रावल यांना मोठ्या पडद्यावर एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखले जाते. परेश रावल यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड इतकी होती की, वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी ते विना तिकीट चित्रपट, नाटक पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचे. तब्बल २५०हून अधिक चित्रपट करूनही त्यांची ही आवड आजही कायम आहे.
परेश रावल यांचा जन्म ३० मे १९५५ रोजी मुंबईत झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गुजराती माध्यम शाळेत झाले. परेश लहानपणापासूनच खूप खोडकर होते. वर्गमित्रांसोबतच्या विविध खोडसाळपणाच्या गोष्टी अनेकदा त्याच्या घरापर्यंत पोहोचायच्या. मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथे त्यांचे घर होते. नवीन भाई ठक्कर सभागृह त्यांच्या घराजवळ होते. इथे जेव्हा कधी नाटक असायचं, तेव्हा परेश रावल यांच्या घरापर्यंत त्याचा आवाज पोहोचायचा. एकदा परेश रावल हिंमत एकवटून त्या थिएटरमध्ये विनातिकीट नाटक बघायला गेले आणि पकडले गेले. तरीही परेश रावल मागे हटले नाहीत. नाटक पाहण्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेड या सर्व गोष्टींचा अवलंब केला. पुढे त्यांनी याच क्षेत्रात येऊन हा मंच गाजवला.
एकदा एनएसडीने आयोजित केलेल्या एका महोत्सवात परेश रावल गेले होते. तिथे त्यांची नजर एका सुंदर साडी नेसलेल्या मुलीवर गेली. ती मुलगी दुसरी कोणी नसून संपत स्वरूप होती, जिने त्यावेळी मिस इंडियाचा किताब पटकावला होता. तिला पाहताच क्षणी परेश रावल आपलं हृदय देऊन बसले. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या मित्र महेंद्र जोशीला परेश यांनी म्हटले की, एक दिवस ही मुलगी त्यांची बायको होईल. महेंद्र जोशी त्या मुलीला ओळखत होते. ते म्हणाले, ‘तू वेडा आहेस का? तुला माहित नाही ही मुलगी कोण आहे? तू जिथे काम करतोस, त्या ठिकाणच्या बॉसची ही मुलगी आहे.’ हे ऐकूनही परेश रावल डगमगले नाहीत. संपतने त्यांचे मन जिंकून घेतले होते. पुढे जाऊन त्यांनी संपत स्वरूप यांच्याशीच लग्न करून आपला शब्द खरा केला.
परेश रावल त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातात. अनेकदा आपण त्याला कॉमेडी अभिनेता म्हणूनच पाहतो. मात्र, त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका देखील साकारली होती. जेव्हा ते कॉमेडी करतात, तेव्हा ते प्रेक्षकांना हसवतात. मात्र, जेव्हा ते खलनायक साकारतात तेव्हा ते सगळ्यांना घाबरवतात. त्यांच्या खलनायकी भूमिका देखील प्रचंड गाजल्या आहेत.
संबंधित बातम्या