Happy Birthday Bharat Jadhav: आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. आज (१२ डिसेंबर) भरत जाधव यांचा वाढदिवस आहे. नाटक असो, मालिका असो किंवा चित्रपट सगळ्याच क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवले. अनेक कलाकार कामाच्या निमित्ताने मुंबई गाठतात आणि मुंबईतच स्थायिक होतात. मात्र, काही महिन्यांपूर्वी अभिनेते भरत जाधव यांनी मुंबई सोडत असल्याचा निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.
अभिनेते भरत जाधव यांनी मुंबई सोडून आता कोल्हापुरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोलापूर हे भरत जाधव यांचं गाव आहे. भरत जाधव यांचे वडील कामानिमित्त मुंबईतच येऊन स्थायिक झाल्याने त्यांचं गावात फारसं कधी जाणं झालं नाही. गावात त्यांच्याकडे स्वतःच घर देखील नव्हतं. कधीकाळी गावी गेलेच तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे राहायचे. यामुळे काही दिवसांपूर्वी भरत जाधव यांच्या वडिलांनी गावी कोल्हापुरात एखादं घर किंवा फ्लॅट घ्यावा, अशी इच्छा भरत यांच्याजवळ बोलून दाखवली होती. आई-वडिलांची हीच इच्छा पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले आणि गावात बंगल्याची शोधाशोध सुरू केली.
आई-बाबांना सरप्राईज द्यावं म्हणून सुरुवातीला भरत जाधव यांनी ही गोष्ट त्यांच्यापासून लपवली होती. भारत जाधव यांनी कोल्हापुरात एक बांगला विकत घेतला आणि त्याचे कागदोपत्री व्यवहार पूर्ण केले. यानंतर तो बांगला आधी भावांना दाखवला. मग, सगळे व्यवहार आणि कामे पूर्ण झाल्यावर एक दिवशी भरत जाधव त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन विमानाने कोल्हापूरला रवाना झाले. या आधी त्यांच्या घरातील कुणीच विमान प्रवास केला नव्हता. त्यामुळे हा विमान प्रवास देखील सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. विमानातून उतरल्यावर त्यांची बस त्यांना घ्यायला आली आणि त्यांना घेऊन ती थेट बंगल्याच्या पार्किंगमध्ये जाऊन उभी राहिली. त्याक्षणी भरत जाधव यांनी हा आपला बंगला असल्याचे म्हणत आई-बाबांना सरप्राईज दिले.
या बंगल्यात आपल्यासोबत कुणीतरी असावं, अशी इच्छा वडिलांनी बोलून दाखवल्यामुळे भरत जाधव यांनी कोल्हापुरातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. या बंगल्याच्या जवळपासच एक शेत खरेदी करून भरत जाधव आणि त्यांच्या पत्नीने या शेतात २०० आंब्याची कलमं आणि १०० नारळाची कलमं लावली आहेत. या सगळ्यातच आता ते रमले आहेत.