Gharoghari Matichya Chuli 4 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या आजच्या भागात ऐश्वर्या घाईघाईने कुठेतरी निघताना पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्याने आजीकडून नानासाहेबांच्या आयुष्यातील एक मोठं सत्य काढून घेतलं आहे. नानासाहेबांची दोन लग्न झाली होती. त्यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा हा हृषिकेश आहे. तर, त्यांची दुसरी पत्नीपासून म्हणजेच आताच्या आईसाहेबांपासून सौमित्र, सारंग आणि शर्वरी अशी तीन मुलं असल्याची ही गोष्ट आता ऐश्वर्याला कळली आहे. मात्र, ऐश्वर्या आता यावरच थांबणार नसून, ती याच गोष्टीचा फायदा घेऊन एक नवा डाव रचणार आहे. मात्र, त्यापूर्वी हिम्मतराव आणि पार्वती आश्रमाशी नाना रणदिवे यांचा काय संबंध आहे, हे शोधून काढण्याचा प्रयत्न ऐश्वर्या करत आहे.
रणदिवेंच्या घरात जानकी आणि हृषिकेश यांच्या लग्न सोहळ्याची तयारी सुरू असल्याने सगळेच आनंदात आहेत. मात्र, दुसरीकडे ऐश्वर्याच्या या नव्या खेळीमुळे सगळेच अडचणी सापडणार आहेत. आता ऐश्वर्या सकाळी सकाळी कुठे जायला निघाली, हे आई तिला विचारत असताना ती देवळात जात असल्याचं खोटं सांगणार आहे. यावेळी जानकी आपली शक्कल लढवून सोबत सारंग भाऊजींना घेऊन जा, असं म्हणते. मात्र, सारंग सोबत नको, मी एकटीच जाऊन येईन लगेच, असं म्हणून ऐश्वर्या तिथून पळ काढते. ऐश्वर्या इतक्या घाईत घराबाहेर गेलेली बघूनच जानकीच्या मनात शंकेची बाल चुकचुकते.
या ऐश्वर्याच्या मनात पुन्हा काहीतरी काळं असल्याचं जानकीच्या लक्षात येतं. आता जानकी ऐश्वर्या नक्की कुठे गेली आहे, याचा विचार करत असताना त्यांच्या दारात एक जोगतीण येते. या जोगतीणीला बघून जानकी तिला घरात बोलवते आणि देवी आईची साग्रसंगीत पूजा करते. घरात आलेली जोगतीण आता जानकीला भविष्यात येणाऱ्या संकटाची सूचना देणार आहे. ‘पोरी तुझा संसार धोक्यात आहे. तुझ्या घरावर येत्या काळात काहीतरी मोठं संकट येणार आहे. सावध हो’, असं म्हणत जोगतीण जानकीला सावध राहण्याचा इशारा देणार आहे.
मात्र, देवी आईच्या अर्थात जोगतीणीच्या या इशारामुळे जानकी चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे. आपल्या घरावर आता कुठलं नवीन संकट येणार, या विचारात जानकी गुरफटून गेली आहे. हे येणारे संकट नक्कीच ऐश्वर्याशी संबंधित असणार, हे तिने मनोमन ओळखलं आहे. आता जानकी या सगळ्यावर काय पाऊल उचलणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या