Gharoghari Matichya Chuli 2 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत सुरुवातीपासून लग्नसराई पाहायला मिळाली आहे. आधी या मालिके सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नावरून चांगलाच ड्रामा झाला होता. यानंतर ऐश्वर्या आणि सारंग यांचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला. नुकताच सौमित्र आणि त्याची प्रेमिका अवंतिका यांचा लग्न सोहळा देखील मंदिरात पार पडला. या लग्नावरून घरामध्ये चांगलाच गदारोळ माजला होता. रणदिवेंच्या घरात लग्नसराईमध्येच बरीचशी ड्रामेबाजी पाहायला मिळाली. इतकं सगळं सुरू असताना आता रणदिवे कुटुंबात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजताना दिसणार आहेत. घरातील सगळ्यांचीच लग्न आता पार पडली आहेत. मग, पुन्हा आता सनई चौघडे कसले? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर, आता पुन्हा एकदा जानकी आणि हृषिकेश यांचा लग्न सोहळा सगळ्यांना पाहायला मिळणार आहे.
जानकी आणि हृषिकेश यांचा हा लग्न सोहळा खास त्यांच्या मुलीसाठी आयोजित केला जात आहे. जानकी आणि हृषिकेश यांच्या मुलीला म्हणजेच चिमुकल्या ओवीने सारंग काका आणि ऐश्वर्या काकीच्या लग्नाचा अल्बम बघण्यास मागितला होता. मात्र, नेहमीप्रमाणे ऐश्वर्या तिच्यावर देखील ओरडली. यामुळे घाबरलेली ओवी रडू लागली होती. चिमुकल्या ओवीला रडताना पाहून सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. यानंतर आजीने तिला ऐश्वर्या-सारंग ऐवजी तुझ्या आई-बाबांच्या लग्नाचा अल्बम बघ, असं सांगत तिच्या चेहऱ्यावर हसू आणलं. यानंतर ओवी देखील खुश होऊन आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचा अल्बम बघण्यासाठी रूममध्ये गेली.
जानकीने देखील तिला लग्नातील सगळे फोटो दाखवले आणि सगळ्यांची ओळख देखील पटवून दिली. या फोटोमध्ये घरातील सगळेच दिसतायेत, पण मी का नाही?, असा प्रश्न चिमुकल्या ओवीला पडला होता. आई-बाबांनी मला त्यांच्या लग्नात बोलवलंच नाही, असं म्हणत ओवी पुन्हा एकदा रुसून बसली. ओवी रुसली आहे, आता तिला कसं हसवायचं? असा प्रश्न घरातील सगळ्यांनाच पडला होता. आई-बाबांच्या लग्नात मी का नव्हते?, असा प्रश्न ओवीने घरातल्या सगळ्यांनाच विचारला होता. मात्र, तिला याचं मनाला पटेल असं उत्तर मिळालेलं नाही. सगळ्यांनीच तिला सांगायचा प्रयत्न केला की, आई बाबांच्या लग्नानंतर तू या घरात आली. मात्र, ओवी हे ऐकून घेण्यास तयारच नाही.
आता ओवीची समजूत काढण्यासाठी म्हणून रणदिवे कुटुंबातील सदस्यांनी मिळून पुन्हा एकदा हृषिकेश आणि जानकी यांचा लग्न सोहळा साजरा करायचा, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रणदिवेंच्या घरात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजताना दिसणार आहेत. तर, हृषिकेश आणि जानकी यांचं लग्न पुन्हा एकदा थाटामाटात पार पडणार आहे.
संबंधित बातम्या