Gharoghari Matichya Chuli 15 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्न सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. रणदिवे कुटुंबात आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नासाठी वेगवेगळ्या सोहळ्यांचे आयोजन आणि त्याची तयारी सुरू आहे. या दरम्यान त्या दोघांच्या लग्नात अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न ऐश्वर्या करताना दिसणार आहे. पार्वती आईचं सत्य आणि नानांच्या पहिल्या लग्नाचं गुपित आता सगळ्यांसमोर आणायचं आणि हृषिकेश व जानकी यांना जोरदार धक्का द्यायचा, असा विडाच ऐश्वर्याने उचलला आहे. सौमित्रवरील रागापोटी ऐश्वर्या आता संपूर्ण रणदिवे कुटुंबाला उद्धवस्त करायला निघाली आहे. या घरातील कुणालाच आनंदी राहू द्यायचं नाही, असं तिनं ठरवलं आहे.
याची सुरुवात तिने जानकी आणि हृषिकेश यांच्या लग्नापासून केली आहे. जानकी आणि हृषिकेश यांच्या लग्न सोहळ्यात आता मेहंदीचा कार्यक्रम रंगताना दिसणार आहे. आता ऐश्वर्या तिच्या एका माणसाकर्वी जानकीपर्यंत मेहंदी पोहोचवणार आहे. मात्र, मेहंदीची पावडर असल्याने आता मेहंदी भिजवावी लागणार असल्याने जानकी मेहंदी भिजवायला घेणार आहे. एका भांड्यात मेहंदी काढत असताना जानकीला त्या मेहंदीच्या पुडक्यावर काहीतरी लिहिल्याचं दिसणार आहे. घाई घाईत सगळी मेहंदी भांड्यात ओतून झाल्यावर जानकी आता त्या पुडक्यावर लिहिलेला मेसेज वाचणार आहे.
या मेसेजमध्ये असं लिहिलं आहे की, ‘तुझ्या जवळचा व्यक्ती तुझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. तू काही गोष्टी तपासून पाहिल्यास, तर तुझं उत्तर तुला नक्कीच मिळेल. मात्र तुझ्या नवऱ्यालाच म्हणजे हृषिकेशला याबद्दल काहीही कळू देऊ नकोस’. हा मेसेज वाचल्यानंतर जानकीला धक्का बसणार आहे. या मेसेजमध्ये लिहिल्याप्रमाणे जानकी आता हृषिकेशचा लॅपटॉप घेऊन, त्यात सुमित्रा इंटरप्राईजेसचे अकाउंट चेक करणार आहे. जानकी लॅपटॉपवर तपास करत असतानाच आता ऐश्वर्या हृषिकेशला एक मेसेज पाठवणार आहे.
या मेसेजमध्ये असे लिहिलेले असणार आहे की, ‘तुमची जवळची व्यक्ती तुमची फसवणूक करत आहे. तुमच्यावर विश्वास नसल्याने ही व्यक्ती आता तुमच्या खाजगी गोष्टींमध्ये काहीतरी तपासत आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर, आत्ताच जाऊन बघा’. हा मेसेज वाचल्यानंतर हृषिकेश त्याच्या रूममध्ये जाणार आहे. त्यावेळी जानकी त्याला त्याचा लॅपटॉप चेक करताना दिसणार आहे. दुसरीकडे, जानकीला सुमित्रा इंटरप्राईजेसचे स्टेटमेंट तपासल्यानंतर त्यात दर महिन्याला एक ते तीन लाख रुपये पार्वती आश्रमाला दिले जात असल्याची माहिती मिळणार आहे. यामुळे तिचा संशय आता आणखीनच बळावणार आहे. लग्न सोहळ्यापूर्वीच हृषिकेश आणि जानकी यांच्या नात्यात गैरसमजाचं बीज पेरण्याचा ऐश्वर्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरेल का, हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या