Sairat Movie Filmy Nostalgia : नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातील अंतिम दृश्याने प्रेक्षकांच्या ह्रदयाला धक्का दिला आणि आजही त्याची आठवण ताजी आहे. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये लहान मुलगा रक्ताने माखलेले पाय घेऊन घराबाहेर पडतो, आणि त्याच्या पायांचे रक्ताचे ठसे त्या दृष्याची वेदना आणि संपूर्ण सार्थकता दर्शवतात. या दृश्याची चित्रीकरण प्रक्रिया मात्र काहीशी अवघड आणि अभिनव होती. नागराज मंजुळे यांनी या दृश्याच्या चित्रीकरणासाठी किती मेहनत घेतली आणि काय काय केले, याची आजही चर्चा होते. .
'सैराट'च्या चित्रीकरणादरम्यान, नागराज मंजुळे यांनी एक नवा प्रयोग केला होता. चित्रपटातील लहान मुलगा आणि त्याचे आईवडील कलाकारांबरोबर एकत्र राहात होते. याचा उद्देश होता की, मुलाला इतर कलाकारांशी चांगले संबंध निर्माण व्हावेत. परंतु, मुलाला त्याची खरी आई सोडून अन्य कलाकारांबरोबर राहणे खूपच कठीण होते. कारण या बाळाला आपल्या आईशिवाय कुणाशीच संवाद साधता येत नव्हता. त्यामुळे, शेवटच्या सीनची चित्रीकरण प्रक्रिया अत्यंत अवघड झाली होती.
नागराज मंजुळे सांगतात की, सुरुवातीला हे दृश्य पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. त्या सीनमध्ये एक लहान बाळ चालत घरात जात असतं. त्या घरात आपल्या आई-बाबांसोबत काय झालं आहे, यांची त्याला कल्पना देखील नव्हती. पण,एका ठिकाणी येऊन त्या बाळाला रडायचे होते. आता हे सगळं कसं करणार, असा प्रश्न नागराज मंजुळे यांना पडला होता. अशावेळी नागराज मंजुळे यांना एक कल्पना सुचली. त्यांनी या बाळाच्या आईलाच शेजारीण म्हणून चित्रपटात दाखवले. त्यामुळे या बाळासोबत सीन करणे सोपे झाले.
आता या मुलाला रडवण्यासाठी देखील त्यांना एक युक्ती सापडली. त्या बाळाला गाड्यांची आवड होती. म्हणून सेटवर एक रिमोट कंट्रोल गाडी आणण्यात आली. नागराज स्वतः गाडीला रिमोटने चालवायचे आणि मुलाला त्याच्या दिशेने घेऊन यायचे. त्यावेळी त्या चिमुकल्याची खरी आई शेजारणीच्या रूपात त्याच्यासमोर यायची. यामुळे मुलाकडून सीन करून घेणे सोपे झाले. ज्यावेळी मुलाला रडवायचे होते, तेव्हा नागराज यांनी गाडी उलट फिरवून मुलाला शेजारणीकडे परत पाठवले. या चित्रीकरणाच्या दरम्यान, गाडीला दूर पळवण्याचे काम त्यांनी केले आणि एकाच प्रयत्नात या महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण पूर्ण झाले.
'सैराट'च्या शेवटच्या सीनमधील लहान मुलगा रक्ताने माखलेले पाय घेऊन घराबाहेर पडतो, हे दृश्य इतके वास्तविक वाटते की, ते प्रेक्षकांच्या मनाला हलवून टाकते. रक्ताचे ठसे दाखवताना, नागराज मंजुळे यांना खून कसा झाला हे दाखवायची गरज नव्हती, कारण त्या ठशांनाच त्या क्रूरतेचे आणि गुन्ह्याचे प्रतीक बनवण्यात आले होते. या दृश्याने 'सैराट' चित्रपटाच्या प्रेक्षकांना धक्का दिला. तो दृश्य इतका वास्तवदर्शी होता की, चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर शोक आणि संतापाचे मिश्रण दिसत होते.
संबंधित बातम्या