‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या मालिकेत आलेल्या वळणामुळे प्रेक्षक चांगलेच हादरले आहेत. आशुतोषचा अपघाती मृत्यू झालेला दाखवल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या मालिकेत आता तरी अरुंधतीच्या आयुष्यात कुठेतरी स्थैर्य येईल आणि ती सुखी होईल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण, अचानक आशुतोषचा मृत्यू दाखवल्याने सगळेच गोंधळून गेले. मात्र, आता प्रेक्षक या प्लॉटवर चांगलेच संतापले आहे. नुकतीच मधुराणी प्रभुलकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर प्रेक्षकांच्या संतप्त कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
‘आशुतोषचं 'जाणं' अनेकांना आवडलं नाहीये...कसं आवडेल.... ! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला... पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल’, अशा आशयाची पोस्ट मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टवर आता प्रेक्षक कमेंट्स करताना दिसत आहेत. यात एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘मी ही मालिका रोज बघतो, मला सीनच्या लोकेशन्सबद्दल कायम एक प्रश्न पडतो... कथानक मुंबईत आहे असं तुम्ही सांगता, तसंच या सीनला तुम्ही एअरपोर्टला जात आहात असं दाखवता, मग मुंबईच्या कुठल्या भागातून असा रस्ता एअरपोर्टला जातो, जो इतका निर्मनुष्य आहे...? काहीतरी लोकेशन सेन्स असावा ना म्हणजे कथानक आणखीन रंजक होईल. एकही माणूस रस्त्यावर नाही, रस्ता सामसूम असं मुंबईत कुठे घडतं..?’
आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘पुन्हा रडत बसलीय आई... वैताग आलाय बघायचा सीरिअल... काय घ्यायचं तुमच्या सीरिअलमधून ते सांगा बर... चांगला मेसेज जाईल लोकांपर्यंत असं काही दाखवता का तुम्ही?’, ‘अरुंधतीचे लग्न परत अनिरुद्धबरोबर लावा, संजना जरा मॅनेज करून घे, यशचे लग्न आरोही बरोबर लावा आणि जमले तर त्या चिमुकल्या जानकीचे देखील लग्न लावा पटकन, एकाच खर्चात सगळी लग्न लावून टाका… जर आप्पाना पण परत लग्न करायचे असेल, तर करुन टाका… सगळी लग्न एकत्र लावा आणि सीरियल संपवा… माझ्या आईची दुपारची झोप मोड थांबवा’, असं देखील एकाने म्हटलं आहे.
‘दुर्दैवाने सीरिअल आता खूपच रटाळ आणि कंटाळवाणी होत आहे, लेखक आणि दिग्दर्शक यांनी नीट लक्ष देणे गरजेचे आहे’, असा सल्ला देखील एकाने दिला आहे. ‘आईचे चरित्र आणि वागणूक भक्कम हवी... आदर्श आई मालिकेमधून दाखवताना कथा भरकटत जात नाही. तुमच्या यां मालिकेत एका सुद्धा जोडप्याचे सुखी आयुष्य नाही. निगेटिव्ह व्हाईब्ज जास्त आहेत आता... सुरुवातीला स्ट्राँग अँड पॉझिटिव्ह होती. पण आता यातील आईला परत पहिल्या नवऱ्याचा आधार घ्यावा लागतो. यात कसली भक्कम आई?’, असं म्हणत एकाने आपला संताप व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या