‘कल्की २८९८ एडी’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. पौराणिक कथा आणि सायन्स फिक्शनचं उत्तम मिश्रण असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर सात दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ही उत्तम कमाई केली आहे. मात्र, आता बॉलिवूड अभिनेता मुकेश खन्ना यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत ‘भीष्मा’ची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना आपल्या स्टाफसोबत हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते. यानंतर त्यांनी चित्रपटाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला आहे. यासोबतच त्यांनी निर्मात्यांना काही प्रश्न विचारले आहेत.
मुकेश खन्ना यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये ते ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाविषयी बोलताना दिसत आहे. या चित्रपटाचे कौतुकही त्यांनी केले आहे. मात्र, त्यांनी चित्रपटाच्या एका सीनवरून निर्मात्यांना प्रश्न विचारला आहे. महाभारतातील वस्तुस्थितीचा कसा विपर्यास करण्यात आला आहे, यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मुकेश खन्ना यांनी चित्रपटाच्या प्रॉडक्शन व्हॅल्यूचे कौतुक केले आहे.
चित्रपटाच्या एका दृश्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मुकेश खन्ना म्हणाले की, ‘चित्रपटाच्या सुरुवातीला कृष्ण अश्वत्थामाच्या कपाळावरील रत्न काढून टाकताना शाप देतो. तसे कधीच झाले नाही. मी निर्मात्यांना विचारू इच्छितो की, जे इथे नाही ते इतरत्र कुठेही असू शकत नाही, असे सांगणाऱ्या व्यास मुनींपेक्षा दोन पावले पुढे जाऊन तुम्ही अधिक कसे जाणून घेऊ शकता? मी लहानपणापासून महाभारत वाचत आलो आहे. अश्वत्थामाने आपल्या पाच मुलांचा वध केला म्हणून द्रौपदीच्या सांगण्यावरून अश्वत्थामाचा मणी पडला होता.’
ते पुढे म्हणाले की, 'अर्जुन आणि अश्वत्थामा यांच्यात मोठे युद्ध झाले होते. त्या युद्धात दोघांनी ब्रह्मास्त्र काढले. कृष्ण आणि व्यास मुनींनी दोघांनाही समजावून सांगितले होते की, ब्रह्मास्त्र वापरू नका. यावर अर्जुनाने ब्रह्मास्त्र परत घेईन, असे सांगितले. पण, अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र परत कसे घ्यावे हे माहित नव्हते. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला विचारले की, तुला ब्रह्मास्त्र कुठे चालवायचे आहे? तेव्हा अश्वत्थामाने उत्तराच्या (अर्जुनाची पत्नी) गर्भावर ब्रह्मास्त्र चालवणार असल्याचे सांगितले. यावर श्रीकृष्णाने त्याला ब्रह्मास्त्र चालवण्याची परवानगी दिली आणि त्यावेळी उत्तरा गर्भवती होती, त्यामुळे कृष्णाने आपल्या चक्राने उत्तराच्या गर्भाचे ९ महिने रक्षण केले.
चित्रपटातील दृश्याविषयी बोलताना ते म्हणाला की, 'मी तुम्हाला ही गोष्ट इतक्या तपशीलवार सांगत आहे. कारण कल्कीच्या अवतारात कृष्ण अश्वत्थामाला त्याचे रक्षण करण्यास कसे सांगू शकेल? हे मला समजत नाही.
मुकेश खन्ना म्हणाले की, प्रत्येक सनातनी हिंदूने या बदलांवर आक्षेप घेतला पाहिजे. चित्रपट बनवताना तुम्ही घेतलेल्या या स्वातंत्र्याचे कोणतेही कारण असू शकत नाही. दाक्षिणात्य चित्रपट निर्माते आपल्या परंपरेचा अधिक आदर करतात, असे मला वाटत होते, पण इथे हे काय झाले? सरकारने एक विशेष समिती स्थापन केली पाहिजे, जी पौराणिक कथांवर बनलेले चित्रपट स्क्रिप्टिंगच्या टप्प्यावरच नाकारेल किंवा मंजूर करेल.'
संबंधित बातम्या