Actor Aman Jaiswal Death : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही सीरियल 'धरतीपुत्र नंदिनी' फेम अभिनेता अमन जयस्वालचा रस्ते अपघातात मुंबईत मृत्यू झाला आहे. २३ वर्षीय अमन बाईकवरून ऑडिशनसाठी जात असताना मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याला उडवले. या अपघातात जखमी झालेल्या अमनला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
'धरती पुत्र नंदिनी' या मालिकेत काम करणारा टीव्ही इंडस्ट्रीतील युवा अभिनेता अमन जयस्वाल यांचे निधन झाले आहे. अमन केवळ २३ वर्षांचा होता. धरती पुत्र नंदिनीचे लेखक धीरज मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अमनचा अपघात झाला होता. त्यांची दुचाकी ट्रकला धडकली आणि या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला.
धीरजने इंडिया टुडेला सांगितले की, अमन ऑडिशन द्यायला जात होता. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, 'तु आमच्या आठवणीत कायम जिवंत राहशील, देव किती क्रूर असू शकतो, आज तुज्या मृत्यूने आम्हाला जाणीव करून दिली आहे.' अलविदा
अपघातानंतर अमनला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र अर्ध्या तासात अभिनेत्याचा मृत्यू झाला.
अमन उत्तर प्रदेशातील बलियाचा होता. धरती पुत्र नंदिनी मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत त्यांनी यशवंत राव फणसे यांची भूमिका साकारली होती. हा शो २०२१ ते २०२३ पर्यंत टेलिकास्ट करण्यात आला होता. अमनने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि तो रवी दुबे आणि सरगुन मेहता यांच्या 'उडारियां' या शोचा ही भाग होता.
अमनने आयएएस अधिकारी, इंजिनीअर किंवा डॉक्टर व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. अमनने अभिनेता होऊ नये, असे त्यांना वाटत होते. मात्र आईने मुलाच्या इच्छेचा आदर करत त्याला साथ दिली होती. आता अमनने या जगाचा कायमचा निरोप घेतल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित बातम्या