'इंद्रायणी' मालिकेतील इंदुचा कीर्तनकार म्हणून नवा प्रवास, आषाढी एकादशी विशेष भाग
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'इंद्रायणी' मालिकेतील इंदुचा कीर्तनकार म्हणून नवा प्रवास, आषाढी एकादशी विशेष भाग

'इंद्रायणी' मालिकेतील इंदुचा कीर्तनकार म्हणून नवा प्रवास, आषाढी एकादशी विशेष भाग

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 17, 2024 08:40 AM IST

'इंद्रायणी' मालिकेत आषाढी एकादशी विशेष भाग आयोजित करण्यात आला आहे. या भागात इंदूचा कीर्तनकार म्हणून प्रवास सुरु झाला आहे.

indrayani serial
indrayani serial

कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. कथा, विषय, सादरीकरण आणि कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर ही मालिका लोकप्रिय ठरतेय. मालिकेत सध्या आषाढी एकादशी विशेष भाग पार पडताना दिसत आहे. विठू पंढरपूरकरचं पुन्हा आगमन झाल्याने यंदाच्या आषाढीला इंदूची इच्छा पू्र्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे.

इंदूच्या नव्या प्रवासाला सुरुवात

'इंद्रायणी' मालिकेत आनंदीने गोपाळचं कीर्तन उधळण्याचा डाव रचल्याचं पाहायला मिळतंय. पण इंदू मात्र विठुच्या वाडीची शान राखणार आहे. मालिकेच्या आगामी भागात इंदूचा कीर्तनकार म्हणून सुरू झालेला प्रवास पाहायला मिळेल. इंदूने नकळत अभंगातला भक्तिभाव शिकला आहे. गोपाळने पत्त्यांचा ध्यास घेतलाय. अशावेळी इंदुचा कीर्तनकार म्हणून सुरू असलेला एकलव्य प्रवास कामी येणार आहे.

आषाढी एकादशी विशेष भागाच्या प्रोमोनुसार सर्व गावकरी गोपाळचं कीर्तन ऐकायला जमले आहेत. पण गोपाळ मात्र गावाबाहेर पळून गेलाय. अशावेळी व्यंकू महाराज कीर्तन म्हणण्याचा प्रयत्न करतात. पण वाचा गेल्याने त्यांना शब्द फुटत नाहीत. अशावेळी कीर्तनकाराच्या रुपात 'बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठल' म्हणत इंदू अवतरते आणि कीर्तनाला सुरुवात करते. इंदूचा कीर्तनकार म्हणून सुरू झालेला प्रवास पाहून गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

इंदूचा खास लूक

डोक्यावर फेटा, धोतर, कुर्ता, जॅकेट, खांद्यावर पंचा, गळ्यात तुळशीची माळ अशा लूकमध्ये कीर्तनकार 'इंद्रायणी' पाहायला मिळत आहे. इंद्रायणीच्या कीर्तनामुळे व्यंकू महाराजांचाही आवाज परत येणार आहे. त्यामुळे मालिकेचे आगामी भाग अधिक रंजक असतील.
वाचा: 'तौबा तौबा'ची हूक स्टेप कतरिनाला आवडल्यानं विकीला आभाळ ठेंगणं; म्हणाला, ऑस्कर मिळाल्यासारखं वाटलं!

'इंद्रायणी' मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईरने या नव्या भूमिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, "कीर्तनाचा आणि माझा आधी दूर दूर संबंध नव्हता. मी कधीच कीर्तनाला गेले नव्हते. पण 'इंद्रायणी' मालिकेच्या शूटिंगदरम्यान मला कीर्तन, अभंग, हरीपाठ या गोष्टी माहिती झाल्या. दिग्दर्शक विनोद लव्हेकर खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी मला समजावून सांगतात. तसेच पाठांतर करताना माझ्या मनात 'विठ्ठल' असतो. त्यामुळे मला आणखी सोप्पे जाते. शूटिंगचे दडपण न घेता मजा घेत मी काम करते. कलर्स मराठीच्या माध्यमातून माझे वारीला जाणे झाले. त्यावेळी विठ्ठलभक्तांना लागलेली विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ पाहून मी हरखून गेले होते. तसेच इंदू या पात्रावर वारकऱ्यांनी केलेला वर्षाव मी कधीही विसरू शकत नाही."

Whats_app_banner