'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'अबीर गुलाल' ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरु झाली आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेतील श्री, शुभ्रा आणि अगस्त्य यांचे त्रिकूट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. मालिकेत शुभ्रा अगस्त्यच्या प्रेमात वेडी झाली आहे. अगस्त्यचं मन जिंकण्यासाठी ती वेगवेगळे प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे श्रीला आता सर्वत्र अगस्त्यचा भास होत आहे. श्रीचं विश्व अगस्तच्या भोवताली फिरत असताना अगस्त्य मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.
'अबीर गुलाल' मालिकेतील अगस्त्य हा निंबाळकर घराण्याचा मुलगा असून सुलक्षणा निंबाळकरांनी त्याच्या लग्नाचा घाट घातला आहे. शुभ्रा आपल्या घराची सून व्हावी अशी अगस्त्यच्या आईची इच्छा आहे. तर शुभ्राने एक पाऊल पुढे येत अगस्त्यला लग्नासाठी प्रपोज केले आहे.पण अगस्त्यने मात्र शुभ्राच्या प्रपोजला रिजेक्ट केलेले प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळाले आहे.
'अबीर गुलाल' मालिकेत दुसरीकडे, श्रीच्या अगस्त्यबद्दलच्या मैत्रीचे रुपांतर आता प्रेमात होऊ लागले आहे. श्रीला सर्वत्र अगस्त्यचा भास होऊ लागला आहे. एकंदरीतच तिचा जीव अगस्त्यमध्ये दडलेला आहे. याआधी अगस्त्य आणि श्रीमधले गोड क्षण प्रेक्षकांना मालिकेत आणि प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहेत. पण आता हे सत्यात उतरेल का? श्री अगस्त्यला आपल्या प्रेमाची कबुली देणार का? अगस्त्य श्रीला आपले सत्य सांगणार का? एका रात्रीत श्रीचे आयुष्य बदलणार का? अगस्त्यची आई श्रीला सून मानणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.
वाचा : 'कॅमेरासमोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो', कोल्हापूरच्या गड्यावर संतापला घनःश्याम
'अबीर गुलाल' मालिकेत श्री ही भूमिका अभिनेत्री पायल जाधव साकारत आहे. मालिकेविषयी बोलताना ती म्हणाली, “मालिकेतील प्रत्येक सीन छान पद्धतीने लिहून आल्याने ते करायला मजा येते. अगस्त्यसारखा मित्र प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवाच असतो. निखळ मैत्री ते प्रेमात पडणं हा प्रवास खूप गंमतीदार होता. श्री आता अगस्त्यच्या पूर्णपणे प्रेमात आहे. अभिनेत्री म्हणून या मालिकेत मला खूप खेळायला मिळतं. रोज वेगवेगळे सीन करताना त्यातले चढ-उतारपाहून खूप शिकायलादेखील मिळते.”
संबंधित बातम्या