Chennai rains Rajinikanth's house flooded : चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर, वाहतूक कोंडी आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. या महापुराचा सामना करण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांना देखील संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे रहिवासी अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील एक ऐतिहासिक ठिकाण असलेल्या पोएस गार्डनमधील सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान व्हिलामध्ये देखील हे पाणी शिरले आहे. सध्याही ही परिस्थिती दाखवणारी, पुराचे दर्शन घडवणारी अनेक दृश्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना धडकी भरवत आहेत.
रजनीकांत यांच्या घराभोवती भरपूर पाणी साचले आहे. त्यांच्या घरी काम करणारे कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत आहेत आणि पुरामुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेत आहेत. रजनीकांत घराच्या सुरक्षेसाठी सगळेच आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत. मात्र, अजून रजनीकांत यांनी यावर काहीही भाष्य केलेले नाही. रजनीकांत यांचा बंगला चेन्नईतील पॉश एरिया पोएस गार्डनमध्ये आहे. त्यांचा बंगला हा शहरातील एका प्रसिद्ध ठिकाणी आहे. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि उद्योगपती येथे राहतात. आणि फक्त रजनीकांतच नाही तर या भागात राहणाऱ्या इतर लोकांनाही हीच समस्या भेडसावत आहे.
मुसळधार पावसामुळे शहरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडली असून, त्यामुळे हे संकट ओढवले आहे. मात्र, रजनीकांत यांच्या निवासस्थानाभोवतीचे पाणी बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नुकसान कमी करण्यासाठी त्यांचे कर्मचारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रजनीकांत यांच्या निवासस्थानी पूर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
हवामानाचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) पुढील दोन दिवस आणखी पावसाचा अंदाज वर्तवला असून, त्यामुळे ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू आणि चेन्नई जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूने प्रभावित जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. आपत्ती निवारण पथके सज्ज असून, २१९ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि आवश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पावसाशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी चेन्नई महापालिकेने २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पाणी साचलेल्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या