Chala Hawa Yeu Dya Off Air Reason : 'झी मराठी'वरील लोकप्रिय आणि हास्यप्रधान कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ प्रेक्षकांचे एक दशकभर मनोरंजन करत होता. त्यातील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीने लोकांच्या मनात आपली वेगळीच जागा निर्माण केली होती. या कार्यक्रमाने सलग १० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पण काही महिन्यांपूर्वीच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसला. दरम्यान, कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये घट झाल्याने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सलग १० वर्षे प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कार्यक्रमाला अशी अचानक उतरती कळा कशी काय लागली, याचा खुलासा स्वतः भाऊ कदम यांनी केला आहे.
विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी नुकतीच रेडीओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, हा कार्यक्रम सुरुवातीला अत्यंत लोकप्रिय ठरला, पण काही काळानंतर त्याचा टीआरपी घसरू लागला. याबाबत बोलताना भाऊ कदम म्हणाले की, 'याचा आयुष्यावर काही परिणाम झाला नाही असं नाही. पण मी या गोष्टींचा विचार केला. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची स्क्रिप्ट अनेक वर्षे एकच माणूस लिहित होता. दुसऱ्या चॅनलवरील कार्यक्रमाच्या तुलनेत इथे काही गोष्टी सतत रिपीट होत होत्या.इतर ठिकाणी प्रत्येक स्क्रिप्ट वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या असतात, ज्यामुळे त्यांच्याकडे अधिक व्हेरिएशन्स असतात. मात्र, आमच्या कार्यक्रमात एकाच लेखकाचा ठरलेला दृष्टीकोन होता, त्यामुळे त्यात फारसा विविधतेचा अनुभव प्रेक्षकांना मिळाला नसावा.'
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम जरी काही काळासाठी बंद झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी या कार्यक्रमाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील. या कार्यक्रमातील कलाकारांमध्ये डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, आणि अंकुर वाढवे यांसारखे विनोदवीर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या कार्यक्रमात विविध विषयांवर स्किट्स सादर केले जात होते. ‘थुकटरवाडी’, ‘पोस्टमन’, ‘होऊ दे व्हायरल’, ‘सेलिब्रिटी पॅटर्न’, ‘लहान तोंडी मोठा घास’ यासारख्या नवनव्या सीझन्समुळे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये कायमचा घर करून राहिला. याशिवाय, मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांचे प्रमोशन देखील या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होतं.
यावेळी बोलताना भाऊ कदम यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की, 'कुठेतरी अपयश हे यशाची पायरी असते. आपलं प्रत्येक स्किट वाजेलच असं नाही. जसा आपला प्रत्येक प्रयत्न हिट होतो, असं नाही. परंतु, काही काळ खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जातो आणि यामध्ये एक वेगळी मजा आहे. प्रत्येक गोष्टीला यश मिळवणे सहज नाही आणि कार्यक्रमाच्या यशापासून अपयशापर्यंतचा प्रवास मी अगदी सकारात्मक पद्धतीने पाहिला.'
संबंधित बातम्या