Bollywood Nostalgia Kissa : एखादा बॉलिवूड चित्रपट बनवला जातो, तेव्हा त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. निर्माते आपले कोट्यवधी रुपये चित्रपटांवर लावतात, मात्र काहीवेळा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात. तर, काही चित्रपट निर्माते कमी बजेटमध्येही चित्रपट बनवून प्रचंड नफा कमावतात. सध्याच्या काळात शाहरुख खान ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देत आहे. परंतु, सलमानचे चित्रपट अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत. पण, आज आम्ही तुम्हाला सलमान खान आणि शाहरुख खानच्या अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो केवळ ६ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि त्याने निर्मात्यांना रेकॉर्डब्रेक नफा कमावून दिला होता. त्यांचा हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
विशेष म्हणजे, आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय त्या चित्रपटात नुकतीच किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनलेली माजी अभिनेत्री ममता कुलकर्णीही मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. सलमान खानसोबतच त्याचा चांगला मित्र बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही या चित्रपटात त्याला साथ दिली होती. मात्र, त्यादरम्यान या दोन्ही स्टार्सनी चित्रपट निर्मात्यांना अडचणीत आणले होते. जेव्हा कधी हे दोघेही सेटवर यायचे तेव्हा चित्रपट दिग्दर्शक देवाकडे त्यांनी शांततेत काम करावे, यासाठी प्रार्थना करत असत, हे खुद्द दिग्दर्शकाने हे मान्य केले होते. या १९९५ साली आलेल्या या चित्रपटाचे नाव 'करण अर्जुन' आहे.
करण अर्जुनमध्ये ममता कुलकर्णीची जोडी अभिनेता सलमान खानसोबत जुळली होती, तर काजोलची जोडी शाहरुख खानसोबत होती. या दोघांची जोडी रुपेरी पडद्यावर खूप पसंत केली गेली. करण-अर्जुनच्या आईची भूमिका साकारणाऱ्या राखी गुलजारनेही या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली होती. या चित्रपटाने बजेटपेक्षा जवळपास ७ पट अधिक कमाई केली होती. 'करण अर्जुन' हा चित्रपट ६ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता आणि रिलीज झाल्यानंतर त्याने अंदाजे ४३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाचा प्रत्येक सीन शूट करताना राकेश रोशनला खूप त्रास झाला. कारण, त्यावेळी सलमान आणि शाहरुखला या चित्रपटाच्या कथानकावर फारसा विश्वास नव्हता. कलाकार सेटवरही वेळेवर येत नव्हते.
त्यावेळेस निर्मात्या राकेश रोशनचे आयुष्य या दोन्ही स्टार्समुळे खूप कठीण टप्प्यात आले होते. 'रोशन्स' या डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये दिसलेल्या शाहरुखनेही आपल्या गैरवर्तनाची कबुली देत म्हटले की, राकेश यांच्या पत्नीने त्याला आणि सलमानला चांगलेच फटकारले होते. 'करण अर्जुन' या चित्रपटाच्या वेळी शाहरुख आणि सलमान तरुण वयात होते. त्यामुळे अनेक अडचणी राकेश रोशन यांच्यासमोर उभ्या राहत होत्या. या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये झाले आहे. विशेष म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेले गाव हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक गाव आहे, ज्याचे नाव भानगढ आहे. आजही हे गांव खूप प्रसिद्ध आहे.
संबंधित बातम्या