आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे अभिनेते म्हणजे सुनील दत्त. आज (६ जून) सुनील दत्त यांचा स्मृतिदिन आहे. सुनील दत्त यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता. ते १८ वर्षांचे असताना भारतात आले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी वडिलांचा मुस्लीम मित्र याकूबयाने आपल्या कुटुंबाला कसे वाचवले, याविषयी अभिनेता सुनील दत्त यांनी एकदा सांगितले होते. एका जुन्या मुलाखतीत सुनील दत्त यांनी सांगितले होते की, पाकिस्तानच्या पंजाबमधील खुर्द येथे त्यांच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तीने त्यांना भारतात पळून जाण्यास मदत केली होती.
एका जुन्या मुलाखतीत सुनील दत्त यांनी सांगितले होते की, अनेक दशकांनंतर तो आपल्या मूळ गावी गेले होते आणि लोकांनी त्यांचे तिथे जोरदार स्वागत केले. गावातील लोक त्यांना भेटायला आले होते. इतकंच नाही तर, त्यांच्या नावाचे मोठमोठे बॅनरही गावभर टांगण्यात आले होते. यावेळी त्यांना त्यांचे शेतही दाखवण्यात आले होते.'
२००५मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सुनील दत्त म्हणाले की, ‘त्यावेळी दूरचित्रवाणी वाहिन्या होत्या. त्यांनी गावकऱ्यांना विचारले की, ते मला इतके आपुलकी आणि सन्मान का देत आहेत?’ त्यावर गावकरी म्हणाले, ‘हा सन्मान त्यांच्या प्रसिद्धीमुळे नाही. त्यांच्या पूर्वजांमुळे आहे. त्यांचे पूर्वज इथे राहायचे. या जमिनी त्यांच्या मालकीच्या होत्या. तरी, त्यांनी आम्हाला इतका सन्मान दिला. ते चांगले लोक होते आणि आमच्या धर्माचा आदर करत होते. आमच्या गावाच्या वेशीवर एक दर्गा आहे. जेव्हा सुनील दत्त यांचे पूर्वज दर्ग्याजवळून जायचे, तेव्हा ते आपल्या घोड्यांवरून उतरायचे, दर्ग्यापार जाईपर्यंत पायी चालत जायचे आणि मग आपल्या घोड्यांवर परत बसायचे. त्यांनी आम्हाला खूप मान दिला. मग, आम्ही त्यांचा आदर का करणार नाही?.’
सुनील दत्त यांनी एक किस्सा सांगताना म्हटले की, ‘मी फक्त पाच वर्षांचा असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. कुठलीही अडचण न येता आम्ही या गावात राहिलो. इथे हिंदूंपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त होती. फाळणीच्या वेळी माझ्या संपूर्ण कुटुंबाला एका मुस्लीम व्यक्तीने वाचवले होते. त्याचं नाव याकूब होतं. तो माझ्या वडिलांचा एक मित्र होता, जो आमच्या गावापासून दीड मैल अंतरावर राहत होता. त्याने आम्हाला झेलम या मुख्य शहरात पळून जाण्यास मदत केली. मॅट्रिकनंतर मी पाकिस्तान सोडलं. लाहोरला जाण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. बेनझीर भुट्टो यांच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाल्यावर मी कराचीला गेलो होतो. माझी पत्नी नर्गिस, ज्यांचे मे १९८१ मध्ये निधन झाले, त्यांनीही माझे गाव, शाळा पाहावी, अशी माझी खूप इच्छा होती.’
सुनील दत्त यांनी १९५८मध्ये नर्गिससोबत लग्न केले होते. अभिनेता संजय दत्त आणि राजकारणी प्रिया दत्त आणि नम्रता दत्त या तीन मुलांचे ते पालक बनले. ‘मदर इंडिया’ (१९५७), ‘साधना’ (१९५८), ‘सुजाता’ (१९६०), ‘पडोसन’ (१९६८), ‘रेश्मा और शेरा’ (१९७१), ‘उमर कैद’ (१९७५), ‘जानी दुश्मन’ (१९७९), ‘रॉकी’ (१९८१), ‘धर्मयुद्ध’ (१९८८), ‘परंपरा’ (१९९३) आणि ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ (२००३) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
संबंधित बातम्या