Bigg Boss OTT 3 : फिनालेआधीच बिग बॉसने दिला जोरदार धक्का; जे जिंकणार वाटत होते तेच स्पर्धक झाले घरातून बाहेर!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3 : फिनालेआधीच बिग बॉसने दिला जोरदार धक्का; जे जिंकणार वाटत होते तेच स्पर्धक झाले घरातून बाहेर!

Bigg Boss OTT 3 : फिनालेआधीच बिग बॉसने दिला जोरदार धक्का; जे जिंकणार वाटत होते तेच स्पर्धक झाले घरातून बाहेर!

Published Jul 31, 2024 08:07 AM IST

Bigg Boss OTT 3 Latest Update: या आठवड्यात, अरमान मलिकसह, लवकेश कटारिया, सना मकबूल आणि साई केतन राव यांनाही घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते.

फिनालेआधीच बिग बॉसने दिला जोरदार धक्का; जे जिंकणार वाटत होते तेच स्पर्धक झाले घरातून बाहेर!
फिनालेआधीच बिग बॉसने दिला जोरदार धक्का; जे जिंकणार वाटत होते तेच स्पर्धक झाले घरातून बाहेर!

Bigg Boss OTT 3 Latest Update:बिग बॉस ओटीटी ३’च्या घरातून दोन मोठ्या खेळाडूंना बाहेर काढण्यात आले आहे. अरमान मलिक आणि लवकेश कटारिया यांना ग्रँड फिनालेपूर्वी अनिल कपूरच्या शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात आपल्या दोन पत्नींसह प्रवेश केलेल्या अरमान मलिकला बिग बॉसने संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले होते. या आठवड्यात, अरमान मलिकसह, लवकेश कटारिया, सना मकबूल आणि साई केतन राव यांनाही घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. यावेळी सगळ्यांनाच वाटत होते की, साई केतन राव बिग बॉसच्या घरातून बाहेर जाऊ शकतो. पण, साई नाही तर, लवकेश कटारिया आणि अरमान बिग बॉसच्या घरातून बाहेर गेले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, लवकेश आणि अरमानला प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांमुळे नाही, तर शोमधील काही टास्कमुळे बाहेर काढले गेले आहे. या टास्कमध्ये बाहेरची व्यक्ती असलेल्या सनाला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. पण, हा टास्क काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या पुढच्या भागाची वाट पाहावी लागणार आहे. अरमान आणि लवकेशच्या एलिमिनेशननंतर ‘बिग बॉस ओटीटी ३’ला ‘टॉप ५’ फायनलिस्ट सापडले आहेत.

Kiara Advani Birthday: कियाराने कोणाच्या सांगण्यावरून बदललं होतं नाव? काय आहे अभिनेत्रीचं खरं नाव? जाणून घ्या...

अरमान मलिक झाला एलिमिनेट

आता ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ट्रॉफीसाठी रणवीर शौरी, सना मकबूल, कृतिका मलिक, साई केतन राव आणि रॅपर नाझी यांच्यात अंतिम लढत पाहायला मिळणार आहे. या ५ स्पर्धकांपैकी, ज्याला लोकांकडून सर्वाधिक मते मिळतील त्याला बिग बॉसचा विजेता घोषित केले जाईल. सध्या अरमान मलिकच्या जाण्याने त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकला मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसच्या संपूर्ण सीझनमध्ये अरमानने ज्याप्रकारे परफॉर्म केले, ते पाहता या शोच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये त्याचा नक्कीच समावेश होईल, असा अंदाज बांधला जात होता. यामुळेच त्याची पत्नी कृतिका त्याच्या एलिमिनेशननंतर आश्चर्यचकित झाली आहे.

लवकेश कटारियालाही दाखवला बाहेरचा रस्ता

अरमानसोबतच एल्विश यादवचा चांगला मित्र लवकेश कटारियालाही बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आले आहे. लवकेश हा एल्विश यादवचा मॅनेजर होता. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या विजेत्यासोबत राहिल्यानंतर त्याने कंटेंट तयार करण्यासही सुरुवात केली. सोशल मीडियावर त्याचे फारसे फॅन फॉलोइंग नसले तरी, एल्विशचे लाखो चाहते त्याला साथ देत होते. सोशल मीडियावर त्याला मिळत असलेला पाठिंबा पाहता, यावेळी फक्त लवकेशच ‘बिग बॉस ओटीटी ३’ची ट्रॉफी जिंकणार असल्याचे बोलले जात होते. पण, ग्रँड फिनालेपूर्वी बिग बॉसने शोमध्ये नवा ट्विस्ट आणून लवकेश आणि एल्विश आर्मीची स्वप्ने उद्ध्वस्त केली. आता ‘बिग बॉस ओटीटी ३’चा सीझन उर्वरित ५ स्पर्धकांपैकी कोण जिंकणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Whats_app_banner