Battalion 50 Marathi Movie: देशाचं संरक्षण करण्यास दिवसरात्र जीवाची पर्वा न करता, डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या सैनिकवर्गाबाबद्दल फार कमी बोललं जातं. विशेषतः प्रजासत्ताक दिन वा स्वातंत्र्यदिन असतांनाच देशासाठी बलिदान दिलेल्यांची आठवण काढली जाते. पण, इतर दिवशी या महान कार्य करणाऱ्या मायबाप सैनिकवर्गाबद्दल फार कमी बोललं जातं. अशाच एका शूरवीराचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'बटालियन ५०' नावाचा एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत, दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित 'बटालियन ५०' या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
'बलोच' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर कीर्ती वराडकर आता 'बटालियन ५०' या चित्रपटासाठी सज्ज झाल्या आहेत. देशाप्रतीची भावना, आदर कीर्ती वराडकर 'बटालियन ५०' या चित्रपटातून घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या मोशन पोस्टर पाहताना अंगावर अक्षरश: काटे उभे राहतात. शरीरातील रक्त सळसळू लागतं आणि इतिहासातल्या या शूरवीरांची गाथा जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. मराठमोळ्या मातीत शून्यापासून प्रयत्न करून हे शूर वीर कसे घडत जातात यांचं रेखाटन या चित्रपटात करण्यात आलं आहे.
'बलोच' फेम अभिनेता गणेश शिंदे चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून, लवकरच चित्रपटातील इतर कलाकारांची नाव समोर येणार आहेत. 'कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत 'बटालियन ५०' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी सांभाळली आहे. तर महेश विनायक कुलकर्णी, 'किंग प्रोडक्शन' आणि तुषार कापरे पाटील यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. 'बटालियन ५०' हा चित्रपट एका शूर सैनिकाची कथा घेऊन लवकरच मोठ्या पडद्यावर येणार असून, साऱ्या देशप्रेमींसाठी हा चित्रपट एक पर्वणीच ठरेल यांत शंकाच नाही.
संबंधित बातम्या