Atul Parchure: चुकीच्या उपचारांमुळे वाढला होता अतुल परचुरे यांचा त्रास, स्वत: दिली होती माहिती
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Atul Parchure: चुकीच्या उपचारांमुळे वाढला होता अतुल परचुरे यांचा त्रास, स्वत: दिली होती माहिती

Atul Parchure: चुकीच्या उपचारांमुळे वाढला होता अतुल परचुरे यांचा त्रास, स्वत: दिली होती माहिती

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Oct 14, 2024 08:12 PM IST

Atul Parchure passed away: मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्करोगावर घेतलेल्या उपचाराविषयी वक्तव्य केले होते.

Atul Parchure
Atul Parchure

Atul Parchure passed away: मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी अतुल यांना कर्करोग झाला होता. पण त्यांनी त्यावर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात केल्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. ते अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या समोर आले होते. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये त्यांनी चुकीच्या उपचारांमुळे त्रास झाल्याचे सांगितले होते.

अतुल परचुरे हे टीव्ही तसंच चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव आहे. जेव्हा त्यांना कर्करोग झाला तेव्हा ते कसे कळाले आणि त्यावर उपचार कसे घेतले हे त्यांनी सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत होते. 'माझ्या लग्नाचा २५वा वाढदिवस होता. तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेलो होतो. तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण काही दिवसांनी माझी जेवणावरची वासना उडू लागली. आवडीचे पदार्थही एकाएकी आवडेनासे झाले. त्यानंतर मला वाटलं काहीतरी चुकतंय. नंतर माझ्या भावाने मला काही औषधे दिली. पण, त्यांचा मला काहीच फायदा झाला नाही. अनेक डॉक्टरांना भेट दिल्यानंतर मला अल्ट्रासोनोग्राफी करण्यास सांगण्यात आले. जेव्हा डॉक्टरांनी हे केले तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात एक भीती दिसली आणि मला वाटले की काहीतरी चुकीचे घडले आहे. त्यावेळी मला सांगण्यात आले की, माझ्या यकृतामध्ये ५ सेमी लांबीची गाठ आहे आणि ती कर्करोगाची आहे' असे अतुल म्हणाले.

चुकीचे उपचार झाले

पुढे ते म्हणाले की, 'मी डॉक्टरांना विचारले की मी ठीक होऊ शकेन की नाही? तेव्हा डॉक्टर म्हणाले की, हो तू ठीक होशील. तथापि, त्यादरम्यानचा उपचारांचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि माझी प्रकृती सतत खालावत गेली. त्याचवेळी शस्त्रक्रिया देखील लांबली.माझ्या पहिल्या उपचार प्रक्रियेत चूक झाली. याचा माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि मला अधिक त्रास होऊ लागला. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडली होती. मला चालताही येत नव्हते. बोलत असताना देखील मी थकून जायचो. अशा स्थितीत डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, जर आता शस्त्रक्रिया केली तर, मला दीर्घकाळ कावीळीचा सामना करावा लागेल आणि माझ्या यकृतात पाणी भरेल. यामुळे मी फारकाळ जगू शकणार नाही. पण, नंतर मी डॉक्टर बदलले, योग्य औषधे आणि केमोथेरपी घेतली.'
वाचा: अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अतुल परचुरे यांच्या कामाविषयी

अतुल परचुरे यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका केली. त्यानंतर कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये ते दिसले होते. आज १४ ऑक्टोबर रोजी अतुल यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Whats_app_banner