Asha Parekh: आशा पारेख यांनी लग्न का केलं नाही?; कारण ऐकून थक्क व्हाल!
Asha Parekh: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला आहे. या निमित्तानं त्यांच्या रील आणि रियल लाइफची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे.
Asha Parekh: हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीबरोबरच खासगी आयुष्याबद्दल नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. आशा पारेख या अविवाहित आहेत. विवाह न करण्याचा निर्णय का घेतला, याचं कारण त्यांनी यापूर्वी स्वत: सांगितलं आहे.
आशा पारेख या चित्रपट निर्माते नासिर हुसैन यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. सिनेसृष्टीत त्यांच्या नात्याची खमंग चर्चा त्या काळात झाली होती. मात्र, नासिर हे विवाहित होते. त्यामुळं हे नातं पुढं जाऊ शकलं नाही. आशा पारेख नासिरवर खूप प्रेम करत होत्या. मात्र, या प्रेमाखातर त्यांना कोणाचं घर, कुटुंब तोडायचं नव्हतं. खुद्द आशा पारेख यांनीच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं होतं.
'अविवाहित राहण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. मी एका विवाहित पुरुषावर प्रेम करायचे, पण मला त्याचं घर उद्ध्वस्त करायचं नव्हतं. त्याच्या मुलांवर मला अन्याय होऊ द्यायचा नव्हता. त्याच्या कुटुंबाखातर मी माझ्या प्रेमाचा त्याग केला. वेळ-काळ आणि परिस्थितीवर बऱ्याच गोष्टी ठरत असतात. जे घडणार आहे, ते तुम्ही थांबवू शकत नाही. जे तुमच्या नशिबात नाही, ते तुम्ही मिळवू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
भूतकाळाची पुनरावृत्ती
आशा पारेख यांच्या बाबतीत भूतकाळाची पुनरावृत्ती झाली होती. नासिर प्रमाणेच आणखीही एक पुरुष त्यांच्या आयुष्यात आला होता. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका प्रोफेसरच्या प्रेमात त्या पडल्या होत्या. त्यांना त्याच्याशी लग्न करण्याचीही इच्छा होती. त्यासाठी त्या अनेकदा त्याला भेटल्या. एकदा कॅफेमध्ये बसलेले असताना त्यानं आपल्या प्रेयसीबद्दल सांगितलं आणि सगळाच खेळ बिघडून गेला. या अनुभवानंतर आशा पारेख यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन टाकला.
'कदाचित लग्न करणं हे माझ्या नशिबात नव्हतं. आपलं लग्न व्हावं, आपल्याला मुलं असावीत असं मलाही वाटायचं, पण तसं झालं नाही. अर्थात, आता मला याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, असंही त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं.
आईचे स्वप्न अधुरे राहिले!
'माझ्या आईनं माझ्यासाठी अनेक मुलं पाहिली, परंतु तिला ती माझ्यासाठी योग्य वाटली नाहीत. काही काळानंतर तिनंही हार मानली. अनेक मुलांशी माझी कुंडली जुळू शकली नाही. त्यामुळं माझं लग्न करण्याचं आईचं स्वप्नही अपूर्ण राहिलं, अशी आठवणही आशा पारेख यांनी सांगितली होती.