Welcome 3 Anil Kapoor: बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार, नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या ‘वेलकम’ या विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटातील ‘मजनू भाई’ आणि ‘उदय भाई’ ही पात्रे आयकॉनिक ठरली. चित्रपटाचे यश पाहून, निर्मात्यांनी २०१५मध्ये ‘वेलकम २’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला आणला. परंतु, तो पहिल्या भागासारखी जादू दाखवू शकला नाही. ‘वेलकम २’मध्येही अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. पण, अक्षय कुमारची जागा जॉन अब्राहमने घेतली आणि हा चित्रपट तिथेच अयशस्वी ठरला.
आता काही महिन्यांपूर्वी निर्मात्यांनी ‘वेलकम ३’ची घोषणा केली होती. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या पुढच्या भागाला ‘वेलकम टू द जंगल’ असे नाव दिले असून, २०२४च्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी तिसऱ्या भागात पुन्हा एकदा अक्षय कुमारही दिसणार आहे. पण, नाना पाटेकर आणि अनिल कपूर या चित्रपटात दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
‘वेलकम ३’मध्ये अक्षय कुमार सोबत संजय दत्त ‘उदय भाई’ची भूमिका साकारणार आहे. तर, अर्शद वारसी ‘मजनू भाई’ची भूमिका साकारणार आहे. आता अनिल कपूरच्या या चित्रपटात सहभागी न होण्यामागचे कारण समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, अनिल कपूरच्या न परवडणाऱ्या फीमुळे निर्मात्यांना अनिच्छेने माघार घ्यावी लागली आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने म्हटले की, ‘अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्याशिवाय ‘वेलकम’ हा चित्रपट होऊच शकत नाही. त्यांना आधी चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांच्यातील ही चर्चा काहीशी फिस्कटली. या ‘वेलकम ३’ चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी तब्बल १८ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर निर्माता फिरोज नाडियाडवाला यांना चांगलाच धक्का बसला.’ अनिल कपूर यांची ही मागणी निर्मात्यांनी फेटाळल्यानंतर अनिल कपूर यांनी स्वतः यातून काढता पाय घेतला.
संबंधित बातम्या