zarina wahab on Religion : अभिनेत्री जरीना वहाबने १९८६मध्ये अभिनेता आदित्य पांचोलीसोबत लग्न केले होते आणि दोघेही आजही एकत्र आहेत. या नात्यात अनेक चढ-उतार आले असले तरी दोघांनीही हे नातं तुटू दिलं नाही. आता जरीनाने नुकतेच आदित्यसोबतच्या आपल्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल भाष्य केले आहे. तिने सांगितले की, त्यांच्या वेगळ्या धर्मामुळे लग्नात कधीही अडचण आली नाही.
रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत जरीना म्हणाली की, ‘त्यावेळी व्हिडिओ फिल्म बनत असत. मलाही ऑफर आली होती, पण मी नकार दिला. परंतु, हा व्हिडिओ चित्रपटासारखा असेल आणि मला यादरम्यान काही प्रॉब्लेम होणार नाही, असे त्यांनी समजावून सांगितले, म्हणून मी होकार दिला. तिथेच माझी निर्मल (आदित्य पांचोलीचे खरे नाव) याच्याशी पहिली भेट झाली. तो दिसायला खूप सुंदर आणि माझ्यापेक्षा लहान होता. तुमचा विश्वास बसणार नाही की, आम्ही फक्त १५-२० दिवसांत लग्न केलं. मला हा चित्रपट करायचा नव्हता, पण कदाचित नवऱ्याला भेटणं माझ्या नशिबात होतं.’
यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, वेगवेगळ्या धर्मामुळे लग्नात काही प्रॉब्लेम आले का? तेव्हा जरीना म्हणाली की, ‘जेव्हा मी त्याच्याशी लग्न केलं, तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की, तो किती हँडसम आहे, तो किती लहान आहे, हे लग्न ५ महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही. पण, आता ३६ वर्षे झाली आहेत. माझ्या घरात अनेक देव आहेत. मी रोज नमाज अदा करते. आमच्या घरात धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. माझे सासरेही चांगले आहेत. कसलाही प्रॉब्लेम नव्हता.’
लग्नासाठी आदित्यने धर्म बदलला होता का? असा प्रश्न देखील यावेळी जरीनाला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना जरीना म्हणाली की, ‘आदित्यने धर्म बदलला नाही, पण त्याने नाव बदलले.’ मुलांच्या नावांबद्दल सांगताना तिने किस्सा सांगितला की, तिने पाकिस्तानी शो पाहिल्यानंतर आपल्या मुलीचे नाव सारा ठेवले होते. तर, एका चित्रपटात आदित्यचे नाव सूरज असल्याने मुलाचे नाव सूरज ठेवण्यात आले. मुलांना हिंदू किंवा इस्लामी नावे द्यायची की नाही, यावर त्यांच्यात कधीच चर्चा झाली नाही.
संबंधित बातम्या